महाराष्ट्राच्या वीजपुरवठा यंत्रणेचे संचालन आणि नियंत्रण करणाऱ्या संगणक यंत्रणेत (स्काडा) परदेशातून सायबर घुसखोरी झाल्याने गेल्यावर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईचा वीजपुरवठा बंद पडला होता, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर पोलिसांच्या तपासाचा हवाला देत म्हटलं होतं. यावरून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह अनिल देशमुख यांच्यावर व महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधलेला आहे. यावर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बावनकुळेंना प्रत्युत्तर देत, भाजपावर टीका केली आहे.

आणखी वाचा- मुंबई बत्तीगुल प्रकरण : गृहविभागाला दिलेल्या अहवालात सायबर सेलचे ३ गंभीर खुलासे!

“भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे हे चीनचे समर्थक आहेत का? चीनची भाषा का बोलत आहेत? चीनच्या रेड इको या ग्रुपचा हात असू शकतो असा अमेरिकेच्या रेकॉर्डेड फ्युचर या कंपनीने भारताच्या सर्टीनला अहवाल दिला आहे. सायबर सेलने ही शक्यता वर्तवली आहे. चीनची चौकशी केली तर भाजपाला त्रास का?” असा सवाल सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे केला आहे.

तर, “स्वत:चे अपयश झाकण्यासाठी महाविकास आघाडी सरकार चीनच्या सायबर हल्ल्यामुळे मुंबई काळोखात बुडाल्याच्या कपोलकल्पित बातम्या पसरवून जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. १२ ऑक्टोबर २०२० रोजी संपूर्ण मुंबई काळोखात बुडाली ती केवळ ऊर्जाखात्यातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि समन्वयाच्या अभावामुळे. मात्र, हे अपयश झाकण्यासाठी गृहमंत्र्यांनी आणि ऊर्जामंत्र्यांनी नवीन शक्कल लढवत आहेत,” असा आरोप राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केला होता. ते नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Mumbai Blackout : “…तर राज्याने हा विषय केंद्र सरकार समोर का मांडला नाही?”

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिलेलं आहे. “मुंबई येथील वीज बंद प्रकरण हा तांत्रिक विषय आहे. हा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना समजू शकणार नाही. त्यांनी या विषयावर बोलून स्वतःचं हसं करून घेऊ नये.” असा टोला देशमुख यांनी ट्विटद्वारे लगावला आहे.

“…चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वतःचं हसं करून घेऊ नये”

मुंबईत झालेल्या बत्तीगुलमागे चीनचा हात असल्याच्या न्यूयॉर्क टाईम्स आणि रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अ‍ॅनालिसीस कंपनीच्या दाव्यांवर महाराष्ट्राच्या सायबर सेलने आपला अहवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवलेला आहे.