गृह विभाग, महाराष्ट्र शासन यांचे आदेशानुसार ठाणे शहर पोलीस यांच्याकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथक यांच्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणे दहशतवाद विरोधी पथकाने तपासाची सर्व कागदपत्रे मुंब्रा पोलीस स्टेशनकडून हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे. तसेच, आज (७ मार्च) मृत मनसुख हिरन यांच्या पत्नी विमला मनसुख हिरेन यांच्या फिर्यादीवरून द वि प पोलीस स्टेशन मुंबई येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांच्या साठय़ासह सापडलेल्या मोटारीचे मालक मनसुख हिरेन यांच्या शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालातील निष्कर्षांबाबत ठाणे पोलिसांनी मौन बाळगल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे.

हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ कायम

मुंबई पोलीस मनसुख यांची चौकशी करीत होते. ती सुरू असतानाच शुक्रवारी ठाणे पोलिसांना त्यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत आढळला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नी विमल यांनी, मनसुख आत्महत्या करूच शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया माध्यमांकडे व्यक्त केली होती. तर, हा घातपाताचा प्रकार असल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांनी केला होता.

अंबानी प्रकरण: कांदिवली क्राइम ब्रांचमधील तावडे नावाची ‘ती’ व्यक्ती कोण?

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये शुक्रवारी मनसुख यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. मात्र, शनिवारी रात्री उशिरापर्यंत ठाणे पोलिसांनी शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालाबाबत मौन बाळगले होते. संवेदनशील प्रकरण असल्यामुळे पोलिसांनी त्यांचा विसेरा कलिना येथील प्रयोगशाळेत पाठविला आहे.