मल्टिप्लेक्समध्ये ‘प्राइम टाइम’मध्ये मराठी चित्रपट दाखवणे हे २०१०च्या सरकारी आदेशानुसार बंधनकारक आहे. या निर्णयाची कठोर अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. मात्र, मराठी चित्रपट प्राइम टाइमला दाखवले जात असले तरी सायंकाळी ६ आणि ९ ची वेळ मराठी चित्रपटांसाठी देण्यास मल्टिप्लेक्सकडून टाळाटाळ केली जाते, ही वेळ मराठी चित्रपटांना मिळायला हवी, अशी मागणी मराठी निर्माता-दिग्दर्शकांनी केली आहे. सरकारच्या २०१०च्या आदेशानुसार मल्टिप्लेक्समध्ये दुपारी १२, ३ सायंकाळी ६ आणि रात्री ९ या सर्व प्राइम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवणे बंधनकारक आहे. मराठी प्रेक्षक हे प्रामुख्याने दुपारीच चित्रपट पाहणे पसंत करतात. रात्रीच्या खेळांना मराठी प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद नसतो. त्यामुळे या वेळेत मराठी चित्रपट कमी दाखवले जातात, असा युक्तिवाद चित्रपटगृहचालकांनी केला. मराठी चित्रपट आता दुपारी १२ आणि ३ या प्राइम टाइममध्ये दाखवले जात आहेत. सायंकाळी आणि रात्री ते दाखवण्यास टाळाटाळ केली जाते. मोठा हिंदी चित्रपट आला तर या कालावधीत मराठी चित्रपट वगळला जातो. तसे होऊ नये, असे ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे म्हणाले. मराठी प्रेक्षक कुटुंबासह चित्रपट पाहण्यास पसंती देतो. सायंकाळची वेळ त्यासाठी आवश्यक आहे. मराठी चित्रपट या वेळेत चालला नाही, तर वेळ बदलण्याचा पर्याय चित्रपटगृहचालकांना आहेच. शिवाय दक्षिणेत सायंकाळचा व रात्रीचा खेळ हा प्राधान्याने दाक्षिणात्य चित्रपटांसाठी असतो. मगमहाराष्ट्रातही मराठी चित्रपटाला प्राधान्याने वेळ मिळत असेल तर मग ओरड कशासाठी, असा सवाल दिग्दर्शक रवी जाधव यांनी केला.मल्टिप्लेक्सना सरकारने सवलतीत जमिनी दिल्या तसेच करमणूक करही माफ केला. त्याबदल्यात आठवडय़ातील काही विशिष्ट दिवस मराठी चित्रपट दाखवावेत. वर्षांतील किमान ३० दिवस मराठी चित्रपटासाठी एक स्क्रीन राखून ठेवण्याचा नियम सरकारने केला होता, मात्र हा नियम चित्रपटगृहे पाळत नाहीत. सरकारने किमान या अपेक्षा ठेवण्यात गैर ते काय, असे राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.