भाजप अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उद्या मातोश्रीवर भेट होणार आहे. मात्र, या भेटीपूर्वीच मुंबई महानगरपालिकेच्या कारवाईमुळे शिवसेना आणि भाजपमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला आहे. अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुंबईतील पेडर रोडसह अनेक ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठीचे बॅनर्स लावण्यात आले होते. मात्र, पालिकेने या बॅनर्सवर कारवाई करण्याचा धडाका लावला असून बहुतांश ठिकाणचे बॅनर्स खाली उतरवले आहेत. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा अशाप्रकारे ‘पाणउतारा’ केल्याने साहजिकच भाजपचे कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. त्यामुळे मातोश्रीवरील उद्धव आणि शहा यांच्या भेटीने शिवसेना-भाजपचे संबंध काहीसे सुधारतील, या अपेक्षेवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेने यावर थेटपणे काही बोलण्याचे टाळले आहे. व्यापारी तसेच उद्योजकांच्या होर्डिंग्जवर प्रशासन कारवाई करत नाही. पण राजकीय पक्षांच्या पोस्टरवर मात्र कारवाई केली जाते. शिवसेनेच्या होर्डिंग्जवरही कारवाई होते. त्यामुळे याबद्दल आयुक्त किंवा संबंधित अधिकारी अधिक सांगू शकतील, असे सांगत शिवसेनेने चेंडू आयुक्तांच्या कोर्टात ढकलला.

मध्यावधी निवडणूक अशक्य!

अमित शहा सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. काल सकाळी त्यांचं मुंबई विमानतळावर आगमन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजप नेत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. शहा यांच्या आगमनानिमित्त भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. शहा मुंबई विमानतळावरून थेट दादर येथील चैत्यभूमीवर गेले. तेथे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर शिवाजी पार्कातील वीर सावरकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर त्यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे याच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले आणि त्यांना आदरांजली वाहिली. शहा यांनी बाळासाहेबांना अभिवादन करून शिवसेनेचे मन जिंकण्याचा प्रयत्न केला आहे, असे जाणकारांना वाटते. मुंबई दौऱ्यात ते रविवारी ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असून शहा ‘मनभेद’ दूर करून ‘मनपरिवर्तन’ करण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘घटकपक्षांना सन्मान द्यावा’