जागतिक आरोग्य संघटनेकडून करोनाला रोखण्यासाठी प्रशासनातर्फे राबवण्यात येत असलेल्या धारावी मॉडेलची दखल घेण्यात आली होती. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आपलं मत व्यक्त केलं आहे. “आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. एवढेच नाही तर कोरोना‍विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं,” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. धारावीसारख्या परिसरात सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्के आहे. तर ॲक्टीव्ह केसेसची संख्या केवळ १६६ आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचे कौतुक करतांना करोना नियंत्रणासाठी केलेल्या कामगिरीबद्दल शाब्बासकी दिली आहे. “हे तुमच्या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांचे यश आहे. धारावीच्या प्रयत्नांची जागतिक स्तरावर घेण्यात आलेली नोंद ही करोना विरुद्धच्या लढ्याला अधिक बळ देणारी आहे,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- काय आहे करोनाशी लढण्याचा धारावी पॅटर्न?

चेस द व्हायरसचे यश – आदित्य ठाकरे</strong>

“या  वस्तीतील करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आव्हानात्मक काम होते. हे आव्हान स्थानिक धारावीकर, महापालिका प्रशासन आणि स्वंयसेवी संस्थांनी स्वीकारले. राज्य शासनाने या सर्वांच्या एकात्मिक प्रयत्नांना बळ देण्याचे काम केले,” असं मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. याठिकाणची ८० टक्के लोकसंख्या ४५० सामूहिक शौचालयांचा वापर करते. बहुतेक लोकसंख्या बाहेरच्या अन्नावर अवलंबून आहे. १० बाय १० च्या घरात इथे आठ ते दहा लोक राहातात. शारीरिक अंतर पाळणे, रुग्णाला होम क्वारंटाइन करणे शक्य नव्हते. अशावेळी “चेस द व्हायरस” उपक्रमातून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटींगची संकल्पना चार पातळीवर वेगाने राबविण्यात आली,” असे ते म्हणाले.

आणखी वाचा- नियंत्रणात आणून दाखवलं; WHO कडूनही करोनासंदर्भातील धारावी मॉडेलचं कौतुक

३.५ लाख लोकांचे स्क्रिनिंग

या मोहिमेत ४७ हजार ५०० घरं डॉक्टर आणि खाजगी दवाखान्यामार्फत तपासण्यात आली. तसंच ३.६ लाख लोकांचे स्कॅनिंग करण्यात आले. प्रो ॲक्टीव्ह स्क्रीनिंग, फिवर कॅम्प, अर्ली डिटेक्शन, योग्य वेळेत विलगीकरण, सुसज्ज आरोग्य सुविधा आणि कॉरंटाइन सेंटर्स तयार करण्यात आले होते. १४ हजार ९७० लोकांचे मोबाईल व्हॅनद्वारे स्कॅनिंग करण्यात आले. तर ८ हजार २४६ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून सर्वेक्षण करण्यात आले. तसंच १४ हजार लोकांना संस्थात्मक कॉरंटाइन करून त्यांचे विलगीकरण करण्यात आले.

आणखी वाचा- खासगी सहभागातून जम्बो रुग्ण व्यवस्थेत चालणार ६१२ आयसीयू बेड!

काय म्हटलं WHO ने ?

“जगात अशी अनेक उदाहरणे आहेत. महामारी अत्यंत गंभीर अवस्थेत असली तरीही ती पुन्हा नियंत्रित केली जाऊ शकते. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि मुंबईतील धारावी जो जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे ही याचीच काही उदाहरणं आहेत. सर्वांना सामील करणं, चाचणी करणे, रुग्णांचा शोध घेणं, त्यांचं अलगिकरण करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि करोनावर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे,” असं मत जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी व्यक्त केलं होतं.