महाराष्ट्राच्या अन्य भागांसह मुंबईतही दररोज करोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने वेगवेगळी पावले उचलली आहेत. करोना रुग्णांच्या या वाढत्या संख्येमुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या मनात लॉकडाउनची भिती निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही, तर लॉकडाउनचा इशाराही सरकारमधील मंत्र्यांनी दिला आहे. दरम्यान मुंबईत दररोज सापडणाऱ्यां पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ८० ते ८५ टक्के रुग्णांमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे नाहीत. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. बुधवारी मुंबईत ११०० पेक्षा जास्त करोना रुग्ण सापडले पण त्यातल्या ८३ टक्के रुग्णांमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे नव्हती असे चहल यांनी सांगितले. लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करुन घेऊ नका, असे पालिका आयुक्तांनी खासगी रुग्णालयांना निर्देश दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील ७८ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहेत, तेच मुंबईत ४९ टक्के अॅक्टिव्ह रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. मागच्या काही आठवड्यातील डाटाचे विश्लेषण केल्यानंतर ७८ ते ८२ टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकानी म्हणाले. बाहेर फिरताना मास्क न वापरऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यात येत आहेत. काल काय होती स्थिती.. बुधवारी, २४ फेब्रुवारी रोजी ११६७ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मागील दोन दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असताना बुधवारी अचानक ही संख्या जवळजवळ दुप्पटीने वाढली आहे. मुंबईत मंगळवारी ६४३ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.