राज्यात करोनाची भीती पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असून, मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रार्थनास्थळं सुरू केल्यामुळेच रुग्णांची संख्या वाढत असल्याचा दावा केला आहे. “दिवाळीत राज्यातील प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच करोना रुग्णांची संख्या वाढली,” असं महापौर पेडणेकर यांनी म्हटलं आहे. “मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. मात्र, ती येण्यास वेळही लागणार नाही. करोना खूप वाईट आहे, तो अजून संपलेला नाही. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल,” अशी भीतीही महापौरांनी व्यक्त केली आहे.

दिवाळीमुळे गर्दी वाढून करोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्याची प्रचिती येताना दिसत असून, राज्यातील करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मुंबईतही करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. “राज्यात दिवाळीमध्ये प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच करोना रुग्णांची संख्या वाढली आहे,” असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

“लोकल ट्रेन आणि शाळा सुरु करण्याबाबत अजूनही सबुरी बाळगली पाहिजे. शाळा सुरु झाल्या की ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’, या मोहिमेत खंड पडेल. सोशल मीडियावरही पालक शाळा उघडू नका, हेच म्हणत आहेत. त्यामुळे मुंबई परिसरातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत करोनाची दुसरी लाट आलेली नाही. मात्र, ती येण्यास वेळही लागणार नाही. करोना खूप वाईट आहे, तो अजून संपलेला नाही. त्यामुळे योग्य काळजी न घेतल्यास हाहा:कार उडेल,” अशी भीती महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केली.

“लोकल ट्रेन सुरु झाल्यास करोना सर्वदूर पसरण्याचा धोका आहे. ट्रेन सुरु झाल्यास सर्व शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचू शकतो. परिणामी मुंबईत बिकट परिस्थिती उद्भवेल. त्यामुळे तुर्तास रेल्वे सुरु होऊ नये, हे माझे प्रामाणिक मत आहे. या सगळ्यावरून एक-दोन टक्के लोक उगीचच कांगावा करत आहेत. त्यांना बोलू द्या, आम्हाला फरक पडत नाही. लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. बाकी सगळं नंतर पाहू,” अशी भूमिका मांडत किशोरी पेडणेकर यांनी विरोधकांवरही निशाणा साधला.