पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेली जनहिताची कामे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पक्षाच्या प्रदेश मुख्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले.

मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यात पक्षाचे केंद्रीय तसेच राज्यातील पदाधिकारी तसेच केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असल्याचे निमित्त साधून कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद साधावा, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तर राज्यातील जनतेशी संवाद साधण्यासाठी केंद्रातील २६ मंत्री महाराष्ट्रात येणार आहेत, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले.