उद्योगांसाठी राज्यातील वातावरण कितीही चांगले असले तरी ‘मेक इन इंडिया’चा तंबू असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलासह शहरातील वातावरण मात्र रविवारी प्रदूषित होते. या आठवडय़ातील शुद्ध हवेच्या एकमेव दिवसाचा अपवाद वगळता शहरातील हवेची प्रतवारी खराब असल्याचेच सातत्याने दिसत आहे.
माझगावमधील हवेची प्रतवारी सर्वात खाली घसरली होती. सूक्ष्म कणांची पातळी सुरक्षित मर्यादेहून चौपटीने वाढली होती. अंधेरी, वांद्रे, भांडुप, मालाडसह नवी मुंबईतही हवा खराब झाली होती. संध्याकाळी समुद्रावरून येत असलेल्या वेगवान वाऱ्यांनाही हे प्रदूषण दूर नेता आले नाही. रविवारी व्हॅलेंटाइन साजरा करण्यासाठी वाहने काढून बाहेर पडलेले मुंबईकर आणि देवनार कचराभूमीत पुन्हा लागलेली आग यासाठी कारणीभूत असू शकतात. २७ जानेवारी रोजी देवनार कचराभूमीला लागलेल्या आगीनंतर तब्बल आठवडाभर संपूर्ण मुंबईत धूर राहिला होता. त्यानंतर या आठवडय़ात सोमवारी हवा अगदी स्वच्छ झाली. मात्र त्यानंतर लगेचच हवेची प्रतवारी कमी
झाली. मुंबईतील सध्याची हवा ही दमा, श्वसनविकार असलेल्या व्यक्तींसाठी जास्त त्रासदायक असून सर्वसामान्यांनाही या हवेचा त्रास होऊ शकतो.

वायुप्रदूषणामुळे १४ लाख मृत्यू झाल्याचा दावा
वॉशिंग्टन येथील अमेरिकन असोसिएशन फॉर द अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेकडून सादर झालेल्या अहवालानुसार २०१३ मध्ये जगभरात तब्बल ५५ लाख लोकांचा वायुप्रदूषणामुळे मृत्यू झाला. त्यात चीनमधील १६ लाख तर भारतातील १४ लाख लोकांचा समावेश आहे. या दोन्ही देशात वेगाने होत असलेल्या औद्योगिकीकरणाला यासाठी जबाबदार धरण्यात आले आहे.भारतातील वायू प्रदूषणासाठी कोळसा, शेतामधील आग आणि स्वयंपाकासाठी जाळला जाणारा लाकूडफाटा जबाबदार असल्याचे या अहवालातील एक संशोधक आणि आयआयटी मुंबईचे प्राध्यापक चंदा वेंकटरमण यांचे म्हणणे आहे.

हवा प्रदूषणाची पातळी
* माझगाव- ४१२
* वांद्रे कुर्ला- ३२६
* अंधेरी- ३४७
* मालाड- ३०३
* भांडुप- ३१२
* नवी मुंबई- ३१७
सुरक्षित पातळी- १००हून कमी