भाजपासोबत यापुढे कोणतीही युती नाही. यापुढील निवडणूक स्वबळाच्या ताकदीवर लढू असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. पालघर पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवेसना भवनात पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी बोलताना त्यांनी भाजपासहित निवडणूक आयोगावरही ताशेरे ओढले.

पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी पांडुरंग फुंडकरांना श्रद्धांजली वाहिली. भाजपाच्या पराभवाचा आनंद होतोय म्हणून पत्रकार परिषद घेण्यात आलेली नाही असंही ते यावेळी बोलले. २०१४ मध्ये पुढील २५ वर्ष हे सरकार जाणार नाही असं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. मात्र पोटनिवडणुकांचे निकाल पाहता यांनी बहुमत गमावलं आहे हे स्पष्ट दिसतंय. चार वर्षात ते खाली खेचले गेले आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवरायांचा अपमान केला असतानाही त्यांचा उमेदवार विजयी झाला याचं दुख: असल्याचं उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं. भाजपाला विजयासाठी काहीही करायचं आहे का असा प्रश्न पडतो असंही ते बोलले.

निवडणूक आयोगावर टीका करताना निवडणूक आयोग म्हणजे नुसतं बुजगावणं आहे का ? असा सवाल त्यांनी विचारला. बाळासाहेबांकडून मतदानाचा मुलभूत अधिकार काढून घेण्यात आला होता अशी आठवण सांगताना एकीकडे मतदान करण्याचं आवाहन केलं जातं आणि दुसरीकडे मशीन खराब होतात, नावं नसतात. सर्व पक्षांनी मिळून निवडणूक आयुक्तांविरोधात करप्ट सिस्टीम अंतर्गत केस केली पाहिजे असंही ते म्हणाले.

एका रात्रीत लाखभर मतं कशी वाढली ? लाखभर मतं वाढली त्याचे पुरावे द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. पराभव झालाय हे मानायला मी तयार नाही. हा पराभव असूच शकत नाही. जनतेच्या भावना आम्ही जवळून पाहिल्या आहेत. पालघरमध्ये शिवसेना ऐनवेळी माघार घेईल असं अनेकांना वाटलं होतं पण तसं झालं नाही. जे शब्द आम्ही दिलेत त्यावरुन मागे हटणार नाही असं आश्वासन देताना त्यांनी शिवसैनिकांचं अभिनंदनही केलं.

भाजपा-शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या पालघर पोटनिवडणुकीत अखेर भाजपाने बाजी मारली. गावित यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामणी वनगा यांचा मुलगा श्रीनिवास यांचा २९,५७२ मतांनी पराभव केला. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपा आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप प्रसारित करून शिवसेनेने प्रचारात रंगत आणली होती. पण याचा शिवसेनेला फायदा झाला नाही. ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपात आलेले राजेंद्र गावित हे विजयी झाले. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.