संदीप आचार्य

मुंबईतील पंचतारांकित रुग्णालये तसेच कोणत्याही खासगी रुग्णालयांना यापुढे परस्पर लक्षणे नसलेले करोना रुग्ण दाखल करण्यास मुंबई महापालिकेने बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहेल यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्य विभागाने २१ मे रोजी एपिडेमिक अॅक्ट १८९७ अंतर्गत आदेश काढून सर्व खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा करोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यास सांगितले. मात्र बहुतेक रुग्णालयांनी याचे पालन तर केले नाहीच, उलट परस्पर खासगी प्रयोगशाळांतून करोना रुग्णांचे अहवाल मिळवून आपल्या रुग्णालयात लक्षण नसलेले करोना रुग्ण दाखल करण्याचा सपाटा लावून पैसे मिळवायचे नवे तंत्र विकसित केले. लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांना करोनासाठी राखीव असलेल्या रुग्णालयात दाखल करू नये अशी सुस्पष्ट मार्गदर्शन तत्वे ‘आयसीएमआर’ ची असताना बहुतेक रुग्णालयांनी तीदेखील धाब्यावर बसवली आहेत. कालपर्यंत मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयातील ८० खाटाही ताब्यात घेतल्या नव्हत्या आणि ‘आयसीएमआर’ची मार्गदर्शक तत्वे धाब्यावर बसविणार्या एकाही रुग्णालयावर कारवाई केलेली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासगी रुग्णालयातील खाटा ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहेल यांनी ३५ खासगी रुग्णालयातील खाटा ताब्यात घेतल्या असून विभाग पातळीवरील नर्सिग होम्समधील खाटा विभाग अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यास सांगितले आहे.

त्यानुसार सध्या पालिकेच्या ताब्यात ३ हजाराहून अधिक खाटा आहेत. मात्र यातील बहुतेक खाटांवरही खासगी रुग्णालये परस्पर लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांना दाखल करत आहेत. यासाठी खासगी प्रयोगशाळांशी संधान बांधून तेथून रुग्णांच्या चाचणी अहवालाची माहिती मिळवली जाते व लक्षण नसलेल्या करोना रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जाते. ज्यांच्याकडे पैसे अथवा आरोग्य विमा आहे अशी लक्षणे नसलेले लोक भीतीपोटी खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या खाटा अडवून बसल्याचे आपण केलेल्या तपासात आढळून आल्याचे पालिका आयुक्त चहेल यांनी सांगितले. यामुळे तीन दिवसांपूर्वी सर्व प्रमुख खागजी रुग्णालयांच्या प्रमुखांची बैठक घेऊन यापुढे लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल केल्यास कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच खासगी रुग्णालयांनी अपवादात्मक बाब वगळता एकही करोना रुग्ण परस्पर दाखल करू नये असेही संबंधितांना सांगितले.

“यासाठी आम्ही एक योजना तयार केली असून खासगी प्रयोगशाळांना यापुढे रुग्णाचे करोना चाचणी अहवाल थेट पालिकेला देणे बंधनकारक केले. हे अहवाल आमच्याकडे सकाळी सहा पर्यंत आल्यानंतर प्रत्येक विभागातील नियंत्रण कक्षातील डॉक्टर रुग्णाशी संपर्क साधून कोणत्या रुग्णालयात दाखल करायचे त्याची व्यवस्था करतील. प्रत्येक वॉर्डात यासाठी १० डॉक्टरांचे पथक व आवश्यक कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. तसेच १० रुग्णवाहिका देण्यात आलेल्या आहेत. लक्षणे नसलेल्या मात्र करोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची व्यवस्था घरी किंवा पालिकेच्या क्वारंटाईन केंद्रात केली जाते. तर ताप किंवा अन्य लक्षणे असलेल्या रुग्णांना त्यांच्यासाठी असलेल्या रुग्णालयात उशीरात उशीरा दुपारी बारा पर्यंत दाखल केले जाणार आहे. ज्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल व्हायचे आहे अशांसाठी वॉर्ड स्तरावर नर्सिग होममधील १०० खाटा ताब्यात घेण्याचे आदेश विभाग अधिकाऱ्यांना दिलेले आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.

खासगी रुग्णालयांना यापुढे लक्षणे नसलेले करोना रुग्ण दाखल करण्यास बंदी घालणारा आदेश पालिकेने जारी केला असून या रुग्णालयातील प्रत्येक रुग्ण पालिकेच्या माध्यमातूनच दाखल केला जाईल, असे आयुक्त चहेल यांनी सांगितले. काही प्रसंगी रुग्ण परस्पर रुग्णालयात गेला तर त्याला दाखल करून घ्यावे. मात्र त्याची माहिती तात्काळ संबंधित विभाग अधिकाऱ्यांना कळवावी लागणार आहे. तसेच लक्षणे नसलेला एखाद्या रुग्णाला नंतर त्रास झाल्यास असा रुग्ण दाखल करून घ्यावा मात्र त्याचीही माहिती देणे बंधनकारक केले आहे. मात्र यापुढे लक्षण नसलेला एकही करोना रुग्ण करोनासाठी राखीव असलेल्या खाटेवर खासगी रुग्णालयांनी दाखल केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आयुक्त इक्बालसिंग चहेल यांनी सांगितले.