पश्चिम रेल्वेवर २० जुलैपासून लोकल प्रवास करण्याआधी अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड असलेला पास बंधनकारक असणार आहे. क्यूआर कोड पास नसेल, तर लोकल प्रवेश मिळणार नाही, अशी माहीती पश्चिम रेल्वेने दिली. तशी उद्घोषणादेखिल पश्चिम रेल्वेच्या स्थानकात होऊ लागली आहे. मध्य रेल्वेवरही क्यूआर कोड पासाची अंमलबजावणी लवकरच होणार असून त्याची तारीख मात्र गुलदस्त्यातच आहे.

राज्य सरकारी कर्मचारी, पालिका कर्मचारी, पोलीस, रुग्णालय कर्मचारी, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मध्य व पश्चिम रेल्वेवर प्रत्येकी ३५० लोकल फे ऱ्या चालवल्या जात आहे. १५ जूनपासून सुरू झालेल्या या सेवेत पश्चिम रेल्वेवरुन सर्वाधिक १ लाख ३० हजार प्रवासी प्रवास करु लागले आहेत. तर मध्य रेल्वेवर हाच आकडा ७० हजारापर्यंत आहे. सध्या या प्रवाशांना कार्यालयीन ओळखपत्रावरच लोकलचे तिकीट व पास उपलब्ध करुन प्रवास दिला जात आहे. परंतु अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु होण्याआधी क्यूआर कोड पास स्कॅन करुन स्थानकात प्रवेश दिल्यानंतर नेमका प्रवासी समजू शकेल व अन्य कोणत्याही प्रवाशाला प्रवास देणे शक्यही होणार नाही की घुसखोरीही होण्याची शक्यता नसेल.

पश्चिम रेल्वेने २० जुलैपासून क्याआर कोड पासची अंमलबजावणी सर्व स्थानकात करण्याचा निर्णय घेतला असून तो पास नसेल तर लोकल प्रवास करता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. तशा उद्घोषणाही पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकात करण्यात येत आहेत. हे पास राज्य सरकारी कर्मचारी, पालिका, पोलीस, केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रत्येक कार्यालयाकडून उपलब्ध होईल. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सत्याकु मार यांनी मध्य, पश्चिम रेल्वे मुंबई पोलिसांच्या मदतीने एक मोबाईल अ‍ॅपही बनवत असून त्याला अंतिम स्वरुप दिले जात असल्याचे सांगितले.

मध्य रेल्वेवरील स्थानकांवर मात्र अशी उद्धोषणा होत नसली तरीही लवकरात लवकर क्यूआर कोड पास उपलब्ध झाल्यास त्याची अंमलबजावणी करणे शक्य होईल,असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी स्पष्ट केले.

१०० पेक्षा जास्त प्रकरणे?

अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना सध्या ओळखपत्रावरच लोकल प्रवेश दिला जात आहे. परंतु यातही काही प्रकरणे अशी आहेत की, अत्यावश्यक  कर्मचाऱ्याकडे ओळखपत्र आहे, परंतु त्यावर योग्य माहीतीही नसल्याने प्रवेश देताना गोंधळ उडत आहे. कुणाचा ओळखपत्रावर फोटो नाही, तर कुणाचा स्टॅम्प नाही अशी वेगवेगळी प्रकरणे समोर आली असून त्यांना काही स्थानकातून प्रवेश देतानाच दुसऱ्या स्थानकातून प्रवेश नाकारण्यात आला आहे. अशी १०० पेक्षा जास्त प्रकरणे मध्य रेल्वेवर उघडकीस आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. तर पश्चिम रेल्वेवर याचे प्रमाण कमी आहे.