मुंबईकरांसाठी शुक्रवारची सकाळ थोडी आश्चर्यकारक ठरली. एकीकडे मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली असतानाच दुसरीकडे आज सकाळी पावसाने हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दादर, माटुंगा, माहिम वडाळा भागात पावसाने हजेरी लावल्याचं पहायला मिळालं. दरम्यान मुंबईत एक ते दोन दिवसांत ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता आहे अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी गुरुवारी दिली होती. "मुंबईमध्ये सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्रात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेलं आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी पश्चिम दिशेने जाणार आहे. त्यामुळे आपल्याकडचे वातावरण ढगाळ स्वरुपाचं आहे. येत्या एक ते दोन दिवसांत हे ढगाळ वातावरण निवळण्याची शक्यता आहे," असं त्यांनी म्हटलं होतं. Maharashtra: Parts of Mumbai receive light drizzle; visuals from Wadala area. pic.twitter.com/ckh83q0DZW — ANI (@ANI) December 11, 2020 यासोबत त्यांनी मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती. "उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव आणि बंगालच्या उपसागरातून येणारे वारे त्याचा प्रभाव म्हणून मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेला जे जिल्हे आहेत तिथे मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे . ११, १२ आणि १३ डिसेंबरच्या दरम्यान धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे," अशी माहिती शुभांगी भुते यांनी दिली.