महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणीत त्यांचा मुलगा रितेश देशमुख भावूक झालेला पाहण्यास मिळालं. केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपती कार्यक्रमाच्या अवयवदानाविषयीच्या विशेष कार्यक्रमात रितेश देशमुख आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत अवयवदान चळवळीला प्रोत्साहन देणाऱ्या मोहन फाऊंडेशनचे डॉ. सुनील श्रॉफही आले होते. या कार्यक्रमात रितेशने अवयवदानाबद्दल तर त्याचं मत व्यक्त केलंच शिवाय तो वडिलांबाबत अत्यंत भावूक झालेला पाहण्यास मिळाला. काय म्हणाला रितेश? "काही गोष्टी नशिबावर अवलंबून असतात. वडील विलासराव देशमुख यांचं लिव्हर ट्रान्सप्लांट करावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. शस्त्रक्रियेसाठी लिव्हर सहज उपलब्ध होईल असं वाटलं होतं. मात्र तसं झालं नाही. शेवटी मी वडिलांसाठी अवयवदानाचा निर्णय घेतला होता. मात्र वैद्यकीय अडचणींमुळे ते शक्य झालं नाही." असं सांगताना रितेशला अश्रू अनावर झाले. "अवयवांची गरज असणाऱ्या रुग्णांची ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी यादी बनवली जाते. ज्या रुग्णांची प्रकृती बिघडत जाते त्यांना ट्रान्सप्लांट प्रक्रियेत प्राथमिकता दिली जाते. जास्त रुग्णांना अवयवांची गरज असते त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन अवयवदान केलं पाहिजे" असंही मत रितेश देशमुखने व्यक्त केलं. अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात रितेश देशमुखला विलासराव देशमुख यांच्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा रितेश म्हणाला की, "बऱ्याचदा अनेक गोष्टी नशिबावर अवलंबून असतात. वडिलांच्या बाबतीत त्यावेळी लिव्हर ट्रान्सप्लांट हा एक पर्याय आहे असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यासाठी डोनर असणं आवश्यक असतं. त्यांच्याकडे यादी असते. त्यातही ज्या रुग्णांची प्रकृती जास्त खालावते त्यांना अवयवदानामध्ये प्राथमिकता मिळते. ही गोष्ट काहीशी विचित्र आणि वेदनादायी गोष्ट आहे. आपल्या देशाची लोकसंख्या एवढी मोठी आहे. तर आपण सगळ्यांनी अवयव दान करण्याचा संकल्प सोडला तर त्याची गरज ज्या लोकांना आहे त्यांचा त्यांना खरोखर उपयोग होईल. अवयव दाते वाढले तर अवयव हवे असणाऱ्यांना जीवनदान मिळू शकतं"