अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने मंगळवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात गणेश मूर्ती आणि मंडपांच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेशोत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

माघी गणेशोत्सव १५ फेब्रुवारी रोजी होत असून करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून उत्सव साजरा करावा. अद्याप करोनाचे सावट पूर्णत: निवळले नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्या सरकारने स्पष्ट केले आहे.

नियम कोणते?

* मंडप उभारणीसाठी पालिकेची अथवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

* मंडप मर्यादित आकाराचा असावा, आगमन-विसर्जन मिरवणुका काढता येणार नाही, सार्वजनिक मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती मूर्तीची उंची दोन फूट असावी, शक्य असल्यास धातूच्या किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

* मंडपात एका वेळी १० पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि १५ पेक्षा अधिक भाविक नसावे.

* सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी सामाजिक उपक्रम, रक्तदान किंवा आरोग्य शिबीर अशा कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे.

* ऑनलाइन किंवा केबल नेटवर्कच्या माध्यमातून दर्शनाची सोय करावी, मंडपात सामाजिक अंतराचे पालन करावे, वेळोवेळी मंडपाचे र्निजतुकीकरण करावे, येणाऱ्या भाविकांची तापमान तपासणी, मुखपट्टीचा वापर, स्वच्छतेचे नियम आदींबाबत दक्षता बाळगावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.

*’ विसर्जनालाही केवळ पाच कार्यकर्त्यांना परवानगी असेल. शिवाय ज्यांना शक्य असेल त्यांनी घरीच गणेश विसर्जन करावे असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.