१० वर्षांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्या चौघांना चिरडणारा अभिनेता सलमान खान याच्यावर निष्काळजीपणे गाडी चालविल्याच्या नव्हे, तर सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली खटला चालविणेच योग्य असल्याचा निर्वाळा देणाऱ्या सत्र न्यायालयाने सलमानवर फेरविचार अर्ज दाखल करून न्यायालयाचा वेळ वाया घालविल्याचे नमूद करीत दंडही सुनावला आहे.
दहा वर्षांनंतर आपल्यावर नवा आरोप ठेवून त्याअंतर्गत खटला चालविण्यास हिरवा कंदील दाखविणाऱ्या वांद्रे न्यायालयाचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा करीत सलमानने सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. पण कधी पाऊस तर कधी अन्य कारणामुळे लटकणारा सलमानच्या अपिलावरील निर्णय देत सत्र न्यायालयाने सलमानला ‘जोर का झटका’ दिला.
वांद्रे न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे नमूद करीत न्यायालयाने सलमानविरुद्धच्या नव्या खटल्यासाठी १९ जुलै ही तारीखही निश्चित केली.