शलाका सरफरे, भाग्यश्री प्रधान

दुग्धजन्य मिठायांच्या दरांत किलोमागे ४० ते १०० रुपयांची वाढ

ठाणे: दिवाळीतील विशेष फराळासोबतच घरी येणाऱ्या पाहुण्यांचे ‘गोड’ स्वागत करण्यासाठी खरेदी करण्यात येणारी मिठाई यंदा खिशाला मोठी कात्री लावणार आहे. दुधाच्या दरांत लिटरमागे झालेल्या दोन रुपयांच्या वाढीकडे बोट दाखवत मिठाईविक्रेत्यांनी यंदा सर्व दुग्धजन्य मिठाया किलोमागे ४० ते १०० रुपयांनी महाग होण्याची शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे, गेल्या काही वर्षांपासून दिवाळीची भेट म्हणून दिल्या जाणाऱ्या सुक्या मेव्याच्या दरांतही घसघशीत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षी मिठाईवर ५ टक्के वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आल्याने दिवाळीत मिठाईच्या किमतीत वाढ झाली होती. या वाढलेल्या किमतीनुसार बाजारात मिठाईची विक्री होत असतानाच यंदा दुधाच्या वाढलेल्या किमतीचे सावट गोड पक्वान्नांवर असल्याचे दिसत आहे. ठाणे-मुंबई शहरांतील दुधाचे दर प्रतिलिटर २ रुपयांनी वाढल्याने दिवाळीच्या तोंडावर मिठाईच्या दरांत वाढ करण्यात येणार असल्याचे ठाण्यातील मिठाईविक्रेत्यांनी सांगितले. दुधापासून तयार होणारी मावा बर्फी, रबडी, बासुंदी, श्रीखंड, बंगाली मिठाई, काजुकतली, बदाम बर्फी या मिठाया महाग होतील, असे गोरस गृहाचे वरुण पुराणिक यांनी सांगितले.

बंगाली मिठाईचा एक नग सध्या ३० रुपयांना विकला जात असला तरी पुढील एक-दोन दिवसात ३५ रुपयांना विकला जाणार आहे. २८० रुपयांना विकण्यात येणारे केशरी श्रीखंड दिवाळीच्या सणात ३०० रुपयांना विकले जाईल, अशी शक्यता मिठाई विक्रेत्यांनी वर्तवली आहे.

अंजीर-पिस्ता महाग

परदेशातून होणारी अंजीर आणि पिस्त्याची आयात घटल्याने यंदा बाजारात प्रतिकिलो ६०० रुपयांची वाढ झाली असून एक किलो अंजीरसाठी तब्बल १६०० ते १८०० रुपये मोजावे लागत आहेत. तसेच पिस्ता ४०० रुपयांनी महाग झाला असून २१०० रुपये किलोने विकला जात आहे. अन्य सुक्या मेव्याचे दर स्थिर असल्याची माहिती जांभळी नाका येथील विक्रेते एन. कारिया यांनी दिली.

सुक्या मेव्याचे दर

* काजू : १२००

*  बदाम : १०००

*  अमेरिकी बदाम : ७००- ८००

*  मामरा बदाम : १२००-१५००

*  नमकीन पिस्ता : ८००-१०००

*  सुगरी खारीक : २००-२५०

*  भारतीय मनुके : १५०-२००

*  अफगाणी मनुके :२५०-३००

(दर रुपये/किलो)