मुंबई : संगीतकार अच्युत ठाकूर यांचे मंगळवारी करोनाने निधन झाले. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले. गेली ४०हून अधिक वर्षे ते संगीत क्षेत्रात कार्यरत होते. गाणे शिकण्यासाठी ते मुंबईत आले. मुंबईत आल्यावर ते गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’ झाले. या वाटेवर त्यांना अनेक दिग्गज गुरूंचे मार्गदर्शन मिळाले. १९८३ ला ‘श्री रामायण’ हा त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट. त्यानंतर ‘पैज लग्नाची’, ‘घे भरारी’, ‘सत्ताधीश’, ‘गृहलक्ष्मी’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘आता लग्नाला चला’, ‘सर्जा राजा’, ‘मर्मबंध’, ‘चिमणी पाखरं’, ‘तुझा दुरावा’, ‘विठाबाई’ अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. २० हून अधिक नाटकांना संगीतबद्ध केले आहे. ३० वर्षांपूर्वी संगीतबद्ध केलेले ‘जांभूळ आख्यान’ आजही लोकप्रिय आहे. अनेक पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.