विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होणार नाही अशारीतीने सहज आणि सुलभ पद्धतीने अंतिम वर्षांच्या परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यासाठी कुलगुरूंची समिती गठित करण्यात आली आहे. आज, रविवारी सकाळी ११ वाजता या समितीची बैठक होणार आहे. समितीने अहवाल सादर के ल्यावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परीक्षा कधी घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात १३ अकृषी विद्यापींठाच्या कुलगुरूंसोबत ऑनलाइन बैठक झाली. उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित अधिकारी सहभागी होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षेसंदर्भातील निर्णयानुसार राज्यातील अंतिम वर्षांच्या परीक्षा कधी आणि कशा एका समान पद्धतीने घेता येतील याचे नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन एकाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन विद्यापीठांनी एक समान पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील याचे नियोजन करावे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार ३० सप्टेंबपर्यंत परीक्षा घेणे शक्य आहे का, याबद्दलही विचार करावा, अशा सूचना सामंत यांनी दिल्या.

झाले काय?

* विद्यार्थ्यांची परीक्षेसंदर्भातील मानसिकता लक्षात घेऊन कमीत कमी संसाधनांमध्ये आणि सहज आणि सोप्या पद्धतीने परीक्षा कशा घेता येतील यासाठीचा अभ्यास करण्यासाठी कुलगुरूंची एक समिती गठित करण्यात आली आहे.

* विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांचा विचार करून परीक्षा कशा आणि कधी घेता येतील यावर उद्या समितीची बैठक होऊन अहवाल सादर होईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.

* समितीच्या निर्णयानंतर कु लपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून परीक्षेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले. बैठकीत गोवा, दिल्ली, मध्य प्रदेश, बनारस विद्यापीठ यांनी कशा पद्धतीने तेथील परीक्षा घेतल्या आहेत, याचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.