भास्कर जाधव नवे प्रदेशाध्यक्ष; पक्षाचे नेतृत्व तरुणांकडे; अल्पसंख्याक मतांवर डोळा
सरकारमधील मंत्र्यांमध्ये केलेल्या फेरबदलापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षसंघटनेत बदल करताना भास्कर जाधव यांची प्रदेशाध्यक्षपदी तर जितेंद्र आव्हाड यांची कार्याध्यक्षपदी निवड करून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरीने राज्यातील पक्षाची सूत्रे तरुण व आक्रमक नेत्यांकडे सोपविली आहेत. असमाधानकारक कामगिरी किंवा आरोपबाजीमुळे वगळण्यात आलेल्या माजी मंत्र्यांकडे पक्षसंघटनेत महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याने या बदलातून राष्ट्रवादीने काय साधले, असा प्रश्न उपस्थित होतो.
उपमुख्यमंत्री अजित पवार व नवे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हे ५० ते ५५ या वयोगटातील असून, जितेंद्र आव्हाड हे पन्नाशीच्या आतील आहेत. तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठीच तरुणांकडे पक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाची प्रतिमा उंचाविण्याकरिता सरकार आणि पक्षसंघटनेत बदल करण्यात येतील, असे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात तसे काही झालेले दिसत नाही. कारण आरोप झालेल्या मंत्र्यांना धक्का लावण्यात आलेला नाही. गुन्हा  दाखल झाल्यामुळे गुलाबराव देवकर यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. मात्र पक्षाने नेमलेल्या १२ समन्वयकांमध्ये (कोअर ग्रूप) देवकर यांना स्थान देण्यात आले. वगळण्यात आलेले भास्कर जाधव यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली तर अन्य पाच जणांना समन्वयक म्हणून नेमण्यात आले.