मुंबई : रेरा कायद्यानुसार नोंदणीकृत गृहप्रकल्पासाठी एकच बँक खाते असणे बंधनकारक आहे. असे असताना काही विकासक एका प्रकल्पाचे बँक खाते इतर प्रकल्पासाठी वापरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्यातील तब्बल एक हजार ७८१ प्रकल्पात या नियमाचे उल्लंघन झाल्याचे उघड झाले असून महारेराने या प्रकल्पाविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी ४५ विकासकांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली आहे. तर इतर विकासकांवर नोटीस बजाविण्यात येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, आता नोंदणीकृत प्रकल्पाच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी महारेराची परवानगी आवश्यक असणार आहे. रेरा कायद्याप्रमाणे एका प्रकल्पासाठी एकच बँक खाते असणे बंधनकारक आहे. संबंधित प्रकल्पातील घरांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम या खात्यात जमा करण्यात येते. बँक खात्यातील ही रक्कम त्याच प्रकल्पासाठी वापरण्यात यावी या उद्देशाने ही उपाययोजना करण्यात आली आहे. ही रक्कम इतरत्र वळवली जाऊ नये आणि प्रकल्प आर्थिक अडचणीत येऊ नये हा यामागील उद्देश आहे. विकासक मनमानीपणे पैशांची उधळपट्टी करू नये यासाठी या खात्यात ७० टक्के रक्कम ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. या खात्यातून प्रत्येक टप्प्यावर पैसे काढताना प्रकल्प किती पूर्ण झाला, किती बाकी आहे, किती पैशांची गरज आहे याबाबतचे प्रकल्प अभियंता, प्रकल्पाचे वास्तुशास्त्रज्ञ आणि प्रकल्प अन्वेषक यांचे प्रमाणपत्र असल्याशिवाय वा त्यांनी तसे प्रमाणित केल्याशिवाय या खात्यातून पैसे काढता येत नाही. असे असताना विकासक या नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे समोर आले आहे. हेही वाचा - विश्लेषण: ‘म्हाडा’ची एकापेक्षा अधिक घरे घेता येतात का? प्रथम येणाऱ्यास प्राधान्य ही योजना काय? हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयुक्तांसंदर्भात दिलेल्या निर्णयाचं राज ठाकरेंकडून स्वागत; म्हणाले, “लोकशाही संस्थांची स्वायत्तता ही…” महारेराच्या झाडाझडतीत एक बँक खाते अनेक प्रकल्पासाठी वापरण्यात आल्याची बाब समोर आली आहे. आतापर्यंत असे एक हजार ७८१ प्रकल्प शोधून काढले आहेत. आता या प्रकल्पातील विकासकांवर ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ४५ जणांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. उर्वरित विकासकांना नोटिसा पाठविण्याचे काम सुरू आहे. या विकासकांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच असे प्रकार रोखण्यासाठी एका प्रकल्पाचे पदनिर्देशित खाते दुसऱ्या प्रकल्पाच्या बँक खात्याशी जोडताच येणार नाही यादृष्टीने संगणकीय प्रणालीत काही महत्त्वाचे बदल महारेराकडून करण्यात आले आहेत. याशिवाय विकासकाने परस्पर खातेबदल करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तसे करता येणार नाही असे बदल करण्यात आले आहेत. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आता विकासकाला बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी महारेराची परवानगी आवश्यक असणार आहे. यासंबंधीचा अध्यादेश महारेराने जारी केला आहे.