मुंबई : राज्यातील पोलीस भरतीसाठी आतापर्यंत १८ लाख अर्ज प्राप्त झाले असून त्यात सुमारे ५० तृतीयपंथीनी अर्ज केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. राज्यभरातून १८ हजार ३३१ पदांसाठी १८ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिवस १५ डिसेंबर होता. मिरा-भाईंदर व पिंपरी-चिंचवड ही आयुक्तालये वाढल्यामुळे यावर्षी १८ हजार ३३१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर तृतीयपंथीयांसाठी पर्याय उपलब्ध करण्यात आला होता. मुंबईतही सात हजार पदांसाठी भरती होत आहे. पोलीस शिपाई, चालक व राज्य राखीव पोलीस दल या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.