मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम असून कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या आठवड्याभरातच तलावांतील जलसाठा ७४.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तलावांमध्ये शुक्रवारी सकाळी तब्बल १० लाख ८२ हजार ८६२ दशलक्ष लिटर जलसाठा उपलब्ध झाला आहे. गुरुवारी सकाळी ६ पासून शुक्रवारी सकाळी ६ पर्यंत कोसळलेल्या पावसामुळे तलावांमध्ये सव्वालाख दशलक्ष लिटरहून अधिक पाण्याची भर पडली आहे.

. पाणलोट क्षेत्रात गुरुवारी दिवसभर दमदार पाऊस –

मुंबईकरांना अप्पल वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलशी या तलावांमधून दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. जूनमध्ये पावसाने ओढ घेतल्यामुळे तलावांमधील जलसाठा रोडावला होता. परिणामी, मुंबई महानगरपालिकेने मुंबईत १० टक्के पाणी कपात लागू केली होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोर धरला आणि तलावांतील जलसाठ्यात सुधारणा होऊ लागली. जलसाठा २५ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने १० टक्के पाणी कपात रद्द केली. गेले काही दिवस तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम आहे. पाणलोट क्षेत्रात गुरुवारी दिवसभर दमदार पाऊस पडत होता. त्यामुळे जलसाठा ७४.८२ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मुंबईत आठवडाभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद

अप्पल वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुलशीमध्ये गुरुवारी अनुक्रमे ११२ मि.मी., १७३ मि.मी., १५८ मि.मी., १४३ मि.मी., १६५ मि.मी., ९२ मि.मी., ९८ मि.मी. पावसाची नोंद झाली. गुरुवारी सकाळी ६ पूर्वी २४ तासांमध्ये पाणलोटक्षेत्रांमध्ये पडलेल्या पावसामुळे तब्बल एक लाख २० हजार ३१२ दशलक्ष लिटर पाण्याची भर तलावांमध्ये पडली आहे.