करोना रुग्णांसाठीही खर्च करता येणार मुंबई : राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून वित्तीय वर्ष २०२१-२२ मधील पहिल्या हप्त्यापोटी ८६१ कोटी ४० लाख रुपयांचा अबंधित (अनटाइड) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तात्काळ पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरित करण्यात येईल, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. या निधीचा वापर करत गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्याच्या करोना साथीच्या काळात रुग्णांसाठी त्वरित मदतकार्य उपलब्ध करण्यासाठी या निधीचा उपयोग करता येईल. राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना अनुक्रमे ८०:१०:१० प्रमाणे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे गावांच्या विकासामध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढणार आहे. उर्वरित निधींपैकी १० टक्के निधी हा जिल्हा परिषदेस, तर १० टक्के निधी हा पंचायत समित्यांना मिळणार आहे. या निधीचा वापर ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्थानिक गरजांनुसार आवश्यक बाबींवर करावयाचा आहे.