मुंबई : मरीन ड्राइव्ह येथे ४३ वर्षीय महिलेने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तेथे अनेक जण उपस्थित असताना कोणीही तिच्या मदतीसाठी धावले नाही. वाहतूक पोलीस सुरेश गोसावी यांनी जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून महिलेला बाहेर काढले. पण, पुढे उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला.
ही घटना सोमवारी सायंकाळी साडेसात वाजता भरतीच्या वेळी घडली. त्यावेळी समुद्र खवळलेला होता. त्यावेळी महिलेने समद्रात उडी मारली.तेथे जमलेल्या गर्दीत कोणीही पुढे येऊन मदत करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र वाहतूक पोलिस शिपाई सुरेश भिकाजी गोसावी यांनी तत्काळ समुद्रात उडी घेतली आणि आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने महिलेचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही.