मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्ट्रॉनिक निविदा घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी होणार असून विशेष न्यायालयाने नुकतेच तसे आदेश दिले आहेत.  विशिष्ट कंपनीला कंत्राट देण्याच्या हेतूने हा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप करीत विवेकानंद गुप्ता यांनी यासंदर्भात २९ सप्टेंबर रोजी विशेष एसीबी न्यायालयाकडे तक्रार नोंदवत पालिकेच्या २२ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. सोमवारी या तक्रारीची गंभीर दखल घेत विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. रणपिसे यांनी या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश एसीबीला दिले. फौजदारी दंडसंहितेच्या कलम १५६ (३)नुसार महानगरदंडाधिकाऱ्यांना दखलपात्र गुन्ह्य़ांमध्ये पोलीस चौकशीचे आदेश देण्याचा अधिकार आहे. त्याच आधारे या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.