राज्यात गोवरला प्रतिबंध करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य कृती दलाने लसीकरणावर भर देण्याच्या सूचना आरोग्य विभागाला केल्या आहेत. कृती दलाने आखलेल्या आराखड्यानुसार प्रजासत्ताक दिनापर्यंत राज्यातील वंचित सर्व बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार वंचित बालकांना एम आर १ आणि २ या लसीची मात्रा देण्यात येणार आहे. राज्य कृती दलाने तयार केलेल्या आराखड्यानुसार विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्याला १५ डिसेंबरपासून सुरुवात झाली असून, हा टप्पा २५ डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्याला १५ जानेवारीपासून सुरूवात करण्यात येणार आहे. या कालावधीत राज्यातील चार लाख बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनापर्यंत राज्यातील लसीकरणापासून वंचित असलेल्या सर्व बालकांना एम आर १ आणि २ या लसीची मात्रा देण्याचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आल्याची माहिती राज्य कृती दलाचे प्रमुख डॉ. सुभाष साळुंके यांनी दिली. हेही वाचा >>> मुंबई: नव्या वर्षात मुंबई उपनगरीय स्थानकात ३० सरकत्या शिड्या; स्थानकात आबालवृद्धांचा प्रवास सुकर होणार या लसीकरणामध्ये ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील लसीकरणापासून वंचित सर्व बालकांचा समावेश आहे. त्यानंतर २८ दिवसांनी या बालकांना लसीची दुसरी मात्रा देण्यात येणार आहे. जेणेकरून या बालकांचे लसीकरण पूर्ण होऊन त्यांच्यामध्ये गोवरचा सामना करण्यासंदर्भातील रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यास मदत होईल. विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यत १९ हजार ६९ बालकांना एम आर १ ची, तर १८ हजार ४७३ बालकांना एम आर २ लसीची मात्रा देण्यात आली आहे. गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून, लसीकरणाने टाळता येतो. हा आजार मुख्यत्वे पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्यांची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि त्यानंतर उर्वरित शरीरावर लाल, सपाट पुरळ ही आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्यूमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदू संसर्ग अशी गुंतागुंत होऊ शकते.