शिवसेना (ठाकरे गट) नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांनी १५ दिवसात सरकार कोसळणार असल्याच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी बंडखोरांवर बोलताना “आता त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. या गल्लीगुंडांना लोक घरी बसवतील ही मला खात्री आहे,” असं मत व्यक्त केलं.ते रविवारी (२३ एप्रिल) वरळीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

सरकार कोसळणार असल्याच्या संजय राऊतांच्या दाव्याविषयी विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रासह देशभरात ५० खोके, एकदम ओके हे सर्वांना माहिती झालं आहे. हे घटनाबाह्य सरकार आहे. त्यामुळे त्यावर बोलण्यात फार वेळ वाया घालवायला नको. लोकांची कामं महत्त्वाची आहेत. देशात आणि राज्यात लोकशाही संपायला लागली आहे असं वाटत आहे.”

“सत्ताधारी केवळ राजकारण करत आहेत”

“बेरोजगारी आणि महागाई प्रचंड वाढत आहे. सगळीकडे उष्णतेची लाट आली आहे. यावर सत्ताधाऱ्यांपैकी कुणीही बोलत नाही. ते केवळ राजकारण करत आहेत. आम्हाला या राजकारणात रस नाही. आम्ही लोकांची सेवा करायला राजकारणात आलो आहे. ते करत राहू,” असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं.

मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

“अजित पवार मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हणाले. त्यांचे बॅनरही लागलेआहेत. मध्यंतरी त्यांची जोरदार चर्चा होती”, असं विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “मी त्यावर काहीच बोलू शकत नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“घोटाळेबाज गद्दारांना भाजपा महाराष्ट्रात पाठबळ का देत आहे?”

“माझा भाजपाला सवाल आहे की, अशा घोटाळेबाज गद्दारांना भाजपा महाराष्ट्रात पाठबळ का देत आहे? भाजपा इतर राज्यात प्रचार करते की, आम्ही भ्रष्टाचार करणार नाही. मग या महाराष्ट्रावर भाजपाचा इतका राग का? ज्यांनी महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी घोटाळा केला त्या गद्दारांना का पाठिंबा दिला?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला.