राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात जोरदार राजकीय टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. राजकारणातील बदललेला काळ आणि परंपरा यावर बोलताना त्यांनी आता कुणीही येतं आणि अगदी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यापर्यंत मजल जाते, असं निरिक्षण मांडलं. तसेच मुख्यमंत्र्यांची खुर्ची तरी राहू दे बाबा म्हणत टोला लगावला. यावेळी त्यांनी ते पहिल्यांदा आमदार म्हणून विधीमंडळात आल्याचे अनुभवही सांगितले.

अजित पवार म्हणाले, “आपला माणूस विधीमंडळात जातो आणि अशा पद्धतीने आवाज काढतो, टवाळी करतो असं मतदारांना दिसलं तर त्यांना काय वाटेल. त्यामुळे आमचे चारही प्रमुख पक्ष, इतर राजकीय पक्ष, अपक्ष सदस्य अशा सर्वांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. सुरुवातीला आम्ही आमदार झालो तेव्हा मधुकर चौधरी होते. त्यावेळी त्यांचा तिथं इतका व्यवस्थित दरारा असायचा की ते उभे असतील तर आम्ही दरवाजात उभे राहायचो. दरवाजा ओलांडायचो नाही.”

“…अरे मुख्यमंत्र्याची खुर्ची आहे तेवढी तरी राहू दे बाबा”

“आता कुणीही येतं आणि अगदी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसण्यापर्यंत मजल चालली आहे. मी त्या दिवशी एकाला सांगितलं अरे मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे तेवढी तरी राहू दे बाबा. तुला १४५-२०० आमदारांचा पाठिंबा मिळाला तर बस,” असंही अजित पवार यांनी सांगितलं.

“अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा”

अजित पवार पुढे म्हणाले, “आम्ही आमदार झालो तेव्हा कॅबिनेट मंत्री समोर बसायचे, तर आम्ही पाठीमागे बसून त्यांच्याशी बोलायचो. बहुतांशवेळा त्यांना सभागृहात डिस्टर्बच करत नसायचो. आज एक पत्र आणून दिलं की १० मिनिटांनी पुन्हा दुसरं पत्र आणून देतात. अरे एकदाच काय द्यायचं ते द्या ना बाबा. काही तरी शिस्त पाळा. सगळ्यांनीच नियमावलीचं पालन केलं पाहिजे.”

“अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते”

“क्रॉसिंग तर अजून कुणाला कळतच नाही. कुठे कोण उभं आहे, कुणीही क्रॉस करतं आणि काहीही करतं. अनेकदा सभागृहात समोर कुणीतरी बोलत असतं आणि इतरजण गप्पा मारत असतात. त्यांची पाठ अध्यक्षांकडे असते. अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते. आल्यावर अध्यक्षांना नमस्कार करायचा आणि मग बसायचं असतं. जाताना अध्यक्षांना नमस्कार करून मग जायचं असतं. नमस्कार करणं तर सोडूनच दिलंय,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.