अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वादग्रस्त ठरलेल्या तीन विश्व साहित्य संमेलनांच्या हिशेबाची एक कोटींची झाकली मूठ  माहितीच्या अधिकाराखाली वारंवार अर्ज करूनही अद्याप उघडलेली नाही. साहित्य महामंडळाने सॅनहोजे, दुबई आणि सिंगापूर येथे विश्व मराठी साहित्य संमेलने आयोजित केली होती. या संमेलनासाठी राज्य शासनाकडून अनुक्रमे २५, २५ आणि ५० लाख रुपयांचे (एकूण १ कोटी) आर्थिक अनुदान देण्यात आले होते. मुळातच ही संमेलने घटनाबाह्य असल्याने आर्थिक मदतीचा विनियोग कसा झाला, संमेलनाचा एकूण खर्च, संपूर्ण लेख्याचे दस्तावेज, पावत्यांच्या प्रती, ऑडिटरकडून सादर झालेले हिशेब याची माहिती एका जागरूक नागरिकाने माहितीच्या अधिकाराखाली मागविली आहे. मात्र अद्याप ती त्यांना मिळालेली नाही. राज्य शासनाकडून साहित्य व संस्कृती मंडळ आणि साहित्य महामंडळाला खर्चाचा सर्व तपशील संबंधिताना द्या, अशी पत्रेही दिली गेली आहेत. मात्र राज्याचा मराठी भाषा विभाग व या दोन्ही संस्थांकडून ही माहिती अद्याप मिळालेली नाही.
विश्व साहित्य संमेलनांचे हिशेब आम्ही शासनाला सादर केले आहेत, असे साहित्य महामंडळाचे पदाधिकारी वारंवार सांगतात. मग त्याचा तपशील अद्याप का देण्यात आला नाही, वारंवार अर्ज करूनही ही माहिती देण्यात नेमकी काय अडचण आहे, हिशेब शासनाला खरोखरच सादर झाला आहे का, हिशेबाची झाकली मूठ ठेवण्यामागे कोणाचा काही स्वार्थ आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.