जनजागृतीनंतरही शेतकरी सांभाळण्यास तयार नाहीत; मुंबईतील १५ गोशाळांमध्ये सुमारे पाच हजार गायी

गोवंशहत्याबंदी कायदा लागू झाल्यावरही भाकड गायींना सांभाळण्यासाठी शेतकरी तयार नसून गोशाळेतील भाकड गायींची संख्या वाढत आहे. मुंबई शहर व परिसरात १५ गोशाळा असून या प्रत्येक गोशाळेत २५० ते ३५० गायी आहेत. गेल्या वर्षांच्या तुलनेत गायींच्या संख्येत १५ ते २० टक्के वाढ झाल्याचे गोरक्षक सांगत आहेत. भाकड गायींपासूनही शेण व गोमूत्रामधून उत्पन्न मिळू शकते याबाबत जागृती होत असूनही शेतकऱ्यांकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईत अनेक ठिकाणी गोशाळा चालवल्या जातात. शेतकऱ्यांनी रस्त्यांवर सोडलेल्या गायी तसेच कत्तलखान्यात येणाऱ्या गायींची किंमत देऊन भाकड गायी या आश्रमांमध्ये आणल्या जात असत. गोरक्षक कायदा आल्यानंतर कत्तलखान्यात गाय विकण्यासाठी बंदी आल्याने गोरक्षकांकडील गायींची संख्या कमी होणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात गायींच्या संख्येत वाढ होत असल्याचे गोरक्षकांचे म्हणणे आहे. रासायनिक खतांच्या शेतीऐवजी सेंद्रिय शेती करण्यासाठी आम्ही उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमातून शेतकऱ्यांना गायींचे महत्त्व पटवून दिले जाते. गायीने दूध देणे बंद केल्यावरही त्यांच्या शेणाचा खतासाठी वापर करता येतो. तसेच आम्ही तीस रुपये प्रति लिटरप्रमाणे गोमूत्र विकत घेण्याचीही तयारी दाखवतो, असे औंधोगोरोटी संस्थेचे राजेश भानुशाली म्हणाले. मात्र या उपक्रमाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात या वर्षी पडलेला दुष्काळही गोरक्षकांवरील भार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे. राज्यभरातील गोशाळांमध्ये शेतकऱ्यांनी वृद्ध गायी व बैल आणून सोडले आहेत. त्यामानाने मुंबईतील भार कमी असला तरी मुंबईच्या गोशाळांमधील गायींच्या संख्येतही वाढ झाल्याचे गोरक्षक सेवा ट्रस्टचे संजय शर्मा म्हणाले.

गोरक्षक कायदा लागू झाल्यानंतर गोशाळांवर त्याचा प्रभाव दिसू लागला आहे. अनेक भाकड म्हणजेच वृद्ध जनावरे आता गोशाळेत रवाना केली जाऊ लागली आहेत. भाकड गाईंसोबतच म्हातारे बैलदेखील या गोशाळेकडे सुपूर्द केले जात आहेत. ज्या गोशाळा खाजगी तत्त्वावर चालवल्या जातात, त्यांना प्रमुख उत्त्पन्न हे गाईंच्या दुधाचेच असते. गोशाळाचे दुग्धजन्य पदार्थ बनवण्याचे उपक्रमही चालतात. मात्र गोशाळांमध्ये भाकड गाईंमध्ये आता बैल येऊ लागल्याने याचा परिणाम हा त्यांच्या उत्त्पादन क्षमतेवर पडू शकतो असे मत कांदिवलीतील गोरक्षक मंडळीचे विवेक शहा यांनी व्यक्त केले.

मुंबई परिसरातील १५ गोशाळांमधून सरासरी ३५० याप्रमाणे ५२५० गायी व बैल आहेत. साधारण शंभर जनावरांपैकी ६० ते ७० गायी व उर्वरित बैल असतात.

पावसाळ्यात चाऱ्याचा प्रति दिवशीचा खर्च ३० ते ४० रुपये तर उन्हाळ्यात ८० रुपयांपर्यंत जातो. याशिवाय साफसफाई, लसीकरण आदींचा खर्च लक्षात घेता दर महिन्याला प्रत्येक गुरामागे तीन ते चार हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे मुंबईतील गोशाळांनी अनुदान वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. असे मुंबई जीवदया मंडळी संस्थेकडून सांगण्यात आली. गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतरसुद्धा जनावरे कतलीसाठी नेण्यात आलेल्या काही जनावरांची सुटका केल्याचीही उदाहरणे आहेत.

मुंबईत वांद्रे, शिवडी, नागपाडा येथे अशा जनावरांच्या मांसाची मागणी आहे. त्यानूसार या भागांत विविध ठिकाणी पोलिसांच्या मदतीने आम्ही वेळोवेळी कारवाई केली आहे. काही प्रकरणांवर न्यायालयात खटलेदेखील सुरू आहेत. काही वेळा कारवाईच्या वेळी बैलाला गुंगी देऊन आणले जाते. ट्रकशिवाय लहान चारचाकी वाहनांमध्येदेखील गुरे आणण्यात येतात.

– चेतन शर्मा, पीपल्स फॉर अ‍ॅनिमल  संस्था