विधानपरिषदेतील आमदार प्रवीण दरेकर यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. तो ठराव चर्चेला येऊन त्यावर मतदान झालं पाहिजे, असं आमदारांचा आग्रह आहे. पण, एकनाथ शिंदे यांच्या गटात नीलन गोऱ्हे यांनी प्रवेश केल्यानंतर दरेकांनी अविश्वाचारा ठराव मागे घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हेंवर अविश्वासाचा ठराव दाखल झाला असेल, तर ते योग्यच आहे, अशी भूमिका आमदार भास्कर जाधव यांनी मांडली.

भास्कर जाधव विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “या अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही. तरुणांच्या हाताला काही लागणार नाही. महिलांना न्याय दिला जाणार नाही. लोकशाहीची बूज राखली जाणार नाही. पाशवी बहुमताच्या अहंकारातून हे कामकाज चालवलं जाईल,” अशी टीका भास्कर जाधव यांनी सरकारवर केली आहे.

गेल्या अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर डोक टेकवून मी पुन्हा या सभागृहात येणार नाही, असं सांगितलं होतं, असा प्रश्न विचारल्यावर भास्कर जाधव म्हणाले, “असं काही नाही, गैरसमज आहे तो. प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, पायऱ्यांना नमस्कार करून सभागृहात जातो. आजही आमचे सदस्य पायऱ्यांवर आंदोलन करत होते. पण, आल्यावर पायऱ्यांना नमस्कार केला आणि सभागृहात गेलो. नंतर आंदोलनात सामील झालो. त्याच पद्धतीने सभागृहातील कामकाज संपल्यावर जाताना लोकशाहीच्या मंदिराला नमस्कार करतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यामुळे मी पुन्हा येणार नाही, असं म्हटलं नव्हते. मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असेही म्हटलं नाही. मात्र, तेव्हा निषेध नोंदवला ही गोष्ट खरी आहे. मला जाणीवपूर्वक बोलू दिल जात नव्हते. यावेळीही मला बोलू दिलं जाणार नाही, असं दिसत आहे. काही लोक लोकशाहीच्या मंदिराला साष्टांग दंडवत घालतात. लोकशाहीची विटंबना करतात. त्यातील मी नाही,” असेही भास्कर जाधव यांनी म्हटलं.