‘धरणात पाणी नाही तर लघवी करायची का’ किंवा ‘रात्रीच्या भारनियमनामुळे लोकसंख्या वाढते’ अशा बेताल वक्तव्यांमुळे अडचणीत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी माफी तर मागावी लागलीच, पण त्याचबरोबर आतापर्यंतच्या राजकीय जीवनातील मोठी चूक झाल्याची कबुलीही द्यावी लागली. अजितदादांच्या या वक्तव्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली असून, यातून मार्ग कसा काढायचा याची चिंता राष्ट्रवादीच्या नेत्यांना पडली आहे.
इंदापूरमध्ये केलेले वक्तव्य अंगाशी येऊ लागताच रविवारी अजित पवार यांनी एका पत्रकाद्वारे माफी मागितली होती. सोमवारी विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये तसेच प्रसार माध्यमांसमोर अजितदादांनी पुन्हा दिलगिरी व्यक्त केली. झाले तेवढे पुरे झाले, आता राज्यातील जनतेने माफ करावे, अशी नरमाईची भूमिका अजितदादांना घ्यावी लागली. सिंचन घोटाळ्यात आरोप झाल्यावर अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर मंत्रिमंडळात पुन्हा सामील झाल्यावर अजितदादांनी आपल्या आक्रमतेला काहीशी मुरड घातली होती. अजितदादा थोडे बदलले, अशी चर्चा अलीकडे ऐकू येऊ लागली होती. पण इंदापूरच्या सभेतील वक्तव्ये अजितदादांनी चांगलीच महागात पडणार अशी चिन्हे आहेत.
माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी एका शिष्टमंडळासमोर पाणी नसेल तर येऊन लघवी करू का, असे वक्तव्य केले होते. पण हे बंद खोलीतील होते.
अजितदादांनी जाहीर सभेत हे वक्तव्य केले असून, त्याचे चित्रीकरण उपलब्ध आहे. अजितदादांनी पातळी सोडून हे वक्तव्य केले आहे. मागे पत्रकारांबाबत अजितदादांनी असेच वादग्रस्त विधान केले होते. तेव्हा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलगिरी व्यक्त करावी लागली होती. अजितदादांचे राजीनामानाटय़ मोठय़ा पवार यांना पसंत पडले नव्हते हे त्यांच्या विधानावरूनच स्पष्ट झाले होते. अजितदादांच्या नव्या विधानावरून शरद पवार यांनी अद्याप काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नसली तरी झालेले नुकसान भरून काढण्याकरिता मोठय़ा पवार यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.
विरोधी पक्ष अजितदादांना लक्ष्य करण्याची संधी सोडणार नाही. तर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण किंवा काँग्रेससाठी अजितदादांचे विधान पथ्थ्यावरच पडणारे आहे. राष्ट्रवादीला नेस्तानाबूत करणे हा काँग्रेस किंवा मुख्यमंत्र्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. अजितदादांची कोंडी झाल्याने काँग्रेसच्या गोटात उत्साहाचेच वातावरण होते.
अजितदादांच्या मदतीला फक्त आर. आर. पाटील
विधिमंडळात विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले असताना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांपैकी फक्त गृहमंत्री आर. आर. पाटील हे मदतीला धावून आल्याचे चित्र बघायला मिळाले. एरवी अजितदादा पक्षाचे मंत्री किंवा आमदारांचा पाणउतारा करण्याची संधी सोडत नाहीत. अजितदादा अडचणीत आल्याने पक्षाचे काही ज्येष्ठ मंत्री तर सारी मजा बघत होते. अजितदादा अडचणीत सापल्याने काही मंत्र्यांना भलतेच भरते आले होते. आमदारही गोंधळलेले होते. अजितदादांचे समर्थन करायचे कसे, असा प्रश्न त्यांना पडला होता. अजितदादांची बाजू घ्यावी तर मतदारसंघात त्याची प्रतिक्रिया उमटण्याची भीती दुष्काळग्रस्त भागातील राष्ट्रवादीच्या एका आमदाराने व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 9th Apr 2013 रोजी प्रकाशित
राजकीय जीवनातील मोठी चूक
‘धरणात पाणी नाही तर लघवी करायची का’ किंवा ‘रात्रीच्या भारनियमनामुळे लोकसंख्या वाढते’ अशा बेताल वक्तव्यांमुळे अडचणीत आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लागोपाठ दुसऱ्या दिवशी माफी तर मागावी लागलीच, पण त्याचबरोबर आतापर्यंतच्या राजकीय जीवनातील मोठी चूक झाल्याची कबुलीही द्यावी लागली.

First published on: 09-04-2013 at 04:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Biggest mistake in political life ajitdada pawar