रालोआत राष्ट्रवादी काँग्रेसला सहभागी करण्याच मुद्दय़ावर शिवसेनेस राजी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना अलीकडेच नवी दिल्लीत बोलावून घेण्यात आल्याची माहितीही एका अन्य भाजप नेत्याने दिली. उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीभेटीत त्यांच्यात आणि भाजपाध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यात याच अनुषंगाने चर्चा झाल्याचे एका दिल्लीस्थित भाजप नेत्याने सांगितले.
उद्धव ठाकरे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठीदेखील असेच अनपेक्षितपणे गुजरातेत जाऊन आले. त्या भेटीचे प्रयोजनही हेच होते, असे कळते. मात्र शिवसेना या क्षणी राष्ट्रवादीच्या प्रश्नावर गोंधळलेली आहे. सेनेसाठी लोकसभेपेक्षा आगामी विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या असून त्या निवडणुकांनंतर काँग्रेस आणि राज ठाकरे यांना दूर ठेवण्यासाठी वेळ पडली तर राष्ट्रवादीकडे मदत मागावी, पण आता नको, अशी सेनेची भूमिका आहे.
भाजप नेत्यांच्या मते शिवसेनेपेक्षाही मोठा अडथळा आहे तो मुंडे आणि शेट्टी यांचा. या दोघांचाही राष्ट्रवादीकडे मदत मागण्यास तीव्र विरोध आहे. राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याचा विचार जरी केला तरी आपण रालोआचा त्याग करू इतकी ताठर भूमिका शेट्टी यांनी घेतल्याचे समजते.
राष्ट्रवादीच्या मुद्दय़ावर या दोघांच्या बरोबरीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हेदेखील मुंडे आणि शेट्टी यांच्यासमवेत आहेत. परिणामी, याच राष्ट्रवादी-विरोधी मंडळींनी भाजप, सेना, रिपब्लिकन, स्वाभिमानी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यातर्फे रालोआच्या प्रचाराचा मुहूर्त घाईघाईने उरकून घेण्यात आला. इचलकरंजी येथे आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेत त्याचमुळे पाच पांडवांची भाषा करण्यात आली, याकडे एका सेना नेत्याने लक्ष वेधले. या पाच पांडवांत आता आणखी कोणी सहावा नको, असे सूचक वक्तव्य या सभेत अनेकांनी केले ते याच उद्देशाने.
यातील महत्त्वाचा भाग हा की, विरोधकांच्या या नेत्रपल्लवीस पवार यांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. विरोधकांच्या अध्र्यापेक्षाही कमी हळकुंडाने पिवळे होण्यास पवारांनी काहीशी नापसंती दाखवली असून, आपले पत्ते ते निवडणुकांनंतरच उघड करतील, अशी चिन्हे आहेत.