धारावी येथील विद्यार्थी आंदोलन आणि तोडफोड प्रकरणी विकास ऊर्फ बबलु पाठक ऊर्फ हिंदूस्तानी भाऊ आणि इतर दोघांना मंगळवारी धारावी पोलिसांनी अटक केली. इकरार खान आणि वकार खान अशी इतर दोघांची नावे आहेत. बेकायदा जमाव जमवणे, पोलिसांवर दगडफेक करणे, पोलिसाला मारहाण करणे, सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान करणे, चिथावणी देणे असे विविध आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन्ही आरोपींना न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. धारावी येथे जमावाने एका पोलीस शिपायाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच दोन पोलिसांवर दगडफेक केली होती. दगडफेकीमध्ये ७५ वर्षीय भाजी विक्रेती महिला जखमी झाली होती. त्यानंतर आता काँग्रेसने हिंदूस्तानी भाऊमागे भाजपाची आयटी सेल असल्याचा आरोप केला आहे.
“जनेतेच्या मनात द्वेष पसरवण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे केले जात आहे. हिंदूस्तानी भाऊच्या माध्यमातून लोकांवर प्रभाव टाकण्यात आला. हिंदूस्तानी भाऊला भाजपाच्या आयटीसेलने पुढे आणले आहे. हिदुस्तानी भाऊच्या मागे असलेली कंपनी भाजपाने सुरु केलेली आहे. अभाविप आणि भाजपामधील कार्यकर्ता या कंपनीच्या मागे आहेत. मोदी सरकारचा सोशल मीडियावर पगडा असल्याने इतके द्वेषपूर्ण आणि शिवीगाळ भाषेची दखल घेतली गेलेली नाही. लोकांना भडकवण्यासाठी, महाविकास आघाडीला बदनाम करण्यासाठी हिंदूस्तानी भाऊचा उपयोग केला जात आहे अशी शंका आहे. त्यामुळे याची चौकशी सरकारने केली पाहिजे,” अशी मागणी काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी एबीपी माझासोबत बोलताना केली.
याआधीही सचिन सावंत यांनी ट्विट करत हिंदूस्तानी भाऊवरुन भाजपावर आरोप केले आहेत. “हिंदूस्तानी भाऊ याला सोशल मीडिया वर प्रस्थापित करुन त्याला फेमस करणारी व्यावसायिक कंपनी ही भाजपा/संघाच्या संबंधित लोकांची होती. अनेक वेळा हा व्यक्ती द्वेषपूर्ण व शिवीगाळ युक्त धर्मांध वक्तव्य करीत असताना फेसबुक व इतर सोशल मीडिया त्यावर कारवाई करत नव्हते. कारण त्याला संरक्षण होते. हल्ली ज्या पध्दतीने मुलांना भडकवण्याचे काम करत आहे व पध्दतशीरपणे आंदोलनं केली जात आहेत त्यामागे मविआ सरकारला अडचणीत आणण्याचा भाजपाचा डाव दिसतो. या सर्व प्रकाराची खोल चौकशी मविआ सरकारने करावी,” असे सचिन सावंत यांनी म्हटले होते.
दरम्यान, अटक केल्यानंतर हिंदूस्तानी भाऊला मोठ्या बंदोबस्तात वांद्रे न्यायालयात नेण्यात आले. ‘आरोपी सराईत असून यापूर्वीही त्याने शिवाजी पार्क येथे आंदोलन केले होते. त्याने इन्स्टाग्रामवर केलेल्या आवाहनानंतर विद्यार्थी धारावी येथे आले, असे सरकारी वकील प्रसाद जोशी यांनी न्यायालयाला सांगितले. हिंदूस्तानी भाऊला उच्चभ्रू हॉटेलमधून अटक केली. तेथे दुसऱ्याच्या नावावर नोंदणी करण्यात आलेल्या खोलीत तो राहत होता. सुमारे ८०० विद्यार्थी त्या ठिकाणी स्वत:हून येणे शक्य नाही. त्यामुळे त्याच्या हॉटेल वास्तव्याचे पैसे कोणी भरले व कुठल्या संघटनेने विद्यार्थाना तेथे पाठवले याचा पोलीस तपास करीत आहेत.