गानकोकिळा लता मंगेशकर यांनी रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. याच शिवाजी पार्कमध्ये लता मंगेशकर यांचं स्मारक उभारावं अशी मागणी भाजपाचे आमदार राम कदम यांनी केलीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून राम कदम यांनी ही मागणी केलीय. मात्र या मागणीसंदर्भात बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राम कदम यांच्या मागणीच्याविरोधात प्रतिक्रिया दिलीय. लतादीदींच्या स्मारकावरुन राजकारण नको, असंही राऊत म्हणालेत.

काय म्हणालेत राम कदम?
राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ज्या ठिकाणी लतादीदींवर अत्यंसंस्कार झाले त्याच शिवाजी पार्कमध्ये त्यांचं स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी केलीय. यासंदर्भातील एक पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं असून स्मारक उभारण्याची भावना लतादीदींच्या सर्व चाहत्यांचीही असल्याचं कदम पत्रात म्हणालेत.

भारतरत्न दिवंगत स्वर्गीय लतादीदींवर शासकीय इतमामात शिवाजी पार्क दादर, येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे याच जागी शिवाजी पार्कवर गानकोकिळा लतादीदींचे स्मृतीस्थळ उभारुन त्यांच्या स्मृती कायमस्वरुपी जतन कराव्यात ही नम्र विनंती मी कोट्यावधी संगीत प्रेमी व लतादीदींच्या चाहत्यांच्या वतीने करत आहेत. तातडीने त्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा आणि त्याच ठिकाणी जगताला प्रेरणा देणारे स्मृतीस्थळ बनवावे, असं राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय.

नक्की वाचा >> शाहरुख खान लतादीदींचं अंत्यदर्शन घेताना थुंकला की…; जाणून घ्या Viral Photos मागील सत्य

याचसंदर्भात संजय राऊत यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता त्यांनी, “काहीजण त्यांच्या स्मारकाबद्दल बोलत असले तरी त्याचं स्मारक करणं सोपे नाहीय,” असं म्हटलंय. “त्या काही राजकारणी नव्हत्या. ते असं व्यक्तीमत्व होतं की त्याचं स्मारक करणं सोपे नाहीय. त्या स्वत: एवढ्या मोठ्या व्यक्ती होत्या की देशालाही विचार कारावा लागेल त्यांच्या स्मारकाबद्दल,” असं राऊत पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणालेत. या वक्तव्यावरुन राऊत यांनी स्मारकाचा राष्ट्रीय स्तरावर विचार केला जावा असे संकेत दिलेत.

नक्की वाचा >> लतादीदींच्या अंत्यदर्शनावरुन शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्यांवर राऊत संतापले; म्हणाले, “हा नालायकपणा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटलजींबद्दल तुम्ही जे बोललात ते फार आवडलं, असं सांगणारा फोन मध्यंतरी लतादीदींनी मला केला होता, असंही राऊत लता मंगेशकर यांच्या आठवणी जागवताना म्हणाले. तसेच त्यांना जेव्हा चांगल्या गोष्टी आवडल्यावर त्या फोन करायच्या आणि सांगायच्या. एखादी गोष्ट नाही आवडली, चांगलं, वाईट लिहिलं तरी फोन करायच्या, असंही राऊत म्हणाले. तसेच मी सतत त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवलं होतं, असंही राऊत यांनी सांगितलं.