युतीच्या नेत्यांना असलेली मतविभाजनाची धास्ती आणि युती-आघाडीच्या तुलनेत मनसेचा थंड प्रचार या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतील महापौरपद पणाला लागलेल्या कोपरी येथील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला.
या निवडणुकीत कोपरीच्या प्रभाग क्रमांक ५१ अ मधून युतीच्या रेखा पाटील ५४९७ मते मिळवून विजयी झाल्या आहेत. त्यांच्यासोबत मैदानात असलेल्या कॉंग्रेसच्या अरुणा भुजबळ यांना २२७६  आणि मनसेच्या स्नेहल सुर्वे यांना ९१३ मते पडली. तर ५७ ब मध्ये नगरसेवक शिवदास भगत यांच्या निधनामुळं पोटनिडणुक घेतली गेली होती. मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विश्वनाथ भगत ३३३२ मते मिळवून निवडून आले आहेत. त्यांच्याविरोधात उभे असलेल्या शेख अकबर अली यांना १००८ मते मिळाली आहेत. रविवारी कोपरी आणि मुंब्रा या प्रभागांसाठी मतदान झालं होतं. त्यावेळी मुस्लिम बहुल मुंब्रा विभागात ३५.४२ टक्के आणि सिंधी बहुल आणि मिश्रित मतदारसंघ कोपरी विभागात ४५.२२ टक्के मतदान झाले होते.
पोटनिवडणूक झालेला मुंब्रा येथील प्रभाग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. तसेच कोपरीमध्ये पराजयाचे तोंड पहावे लागले तर महापौरपद हातचे गमवावे लागेल या भीतीपोटी शिवसेनेचे सर्व स्थानिक नेते गेल्या काही दिवसांपासून कोपरीत ठाण मांडून बसले होते.
सध्या ठाणे महापालिकेत आघाडी आणि युतीकडे सध्या ६४-६४ असे संख्याबळ आहे. आजच्या निकालाने पुन्हा ६५-६५ असे समीकरण तयार झाले असून, संख्याबळ वाढवण्यासाठी मनसेचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होणार आहे.