कल्याणमधील वालधुनी आणि काटेमानीवली भागाला जोडणाऱ्या पुलाचा काही भाग १४ डिसेंबरच्या मध्यरात्री काम सुरू असताना टेकू देणाऱ्या पट्टय़ा घसरल्याने कोसळला. याप्रकरणी तब्बल १२ दिवसानंतर पोलिसांनी हा पूल उभारणारे ठेकेदार मुलचंद जेठवाणी, मुकादम जितू छोटवाणी आणि कामगार कंत्राटदार मुलचंद विश्वास यांच्यावर महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले.
‘एमएमआरडीए’च्या अनुदानातून कल्याण-डोंबिवली पालिकेतर्फे सन २००८ पासून या पुलाचे काम सुरू आहे. १२ कोटी ७६ लाख खर्चाच्या या पुलाचे काम उल्हासनगरच्या कोनार्क इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला देण्यात आले आहे. पूल उभारणीची मुदत संपूनही या पुलाचे काम सुरू आहे. या पुलाच्या कामाचे कल्याण-डोंबिवली पालिकेने सुमारे ७ कोटींहून अधिक रकमेचे देयक अदाही केले आहे. १४ डिसेंबरच्या रात्री या पुलाचे स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना पुलाचा काही भाग कोसळला आणि त्यामध्ये पाच जण जखमी झाले होते.
अपघात होऊनही याबाबत गुन्हा दाखल होत नसल्याने हे प्रकरण दाबले जाते की काय अशी शंका नागरिकांमध्ये उपस्थित करण्यात येत होती. पालिकेच्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी ठेकेदाराला पूल उभारण्याचा अनुभव नसल्यानेच हा प्रकरा घडला असल्याची टीका केली होती. या प्रकरणाची शासकीय उच्च अभियंत्यांकडूनही चौकशी करण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने नगरसेवकांना दिले आहे. या प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या प्रकल्प अभियंत्यावर प्रशासन कोणती कारवाई करणार, असाही प्रश्न नगरसेवकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.