भारतीय आयुर्वेद चिकित्सा केंद्रीय परिषद (सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन)सीसीआयएमच्या महाराष्ट्रातील निवडणुकीत ‘वैद्यकीय विकास मंच’चे पाचही उमेदवार विजयी झाले. देशपातळीवरील या परिषदेचे एकूण सत्तर सदस्य असून महाराष्ट्रातील पाच जागांसाठी एकूण पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. यात भाजप परिवाराशी संबंधित ‘वैद्यकीय विकास मंच’च्या पाच सदस्यांचे पॅनल दणदणीत विजयी झाले. आयुर्वेद शिक्षण, आयुर्वेदाचा जागतिक प्रसार व मान्यता यासह विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न असे मुद्दे घेऊन वैद्यकीय विकास मंच या निवडणुकीत उतरलेल्या मंचचे डॉ. सदानंद सरदेशमुख, डॉ. जयंत देवपुजारी, डॉ. सुर्यकीरण वाघ, डॉ. ए. सावंत आणि डॉ. ज्ञानेश्वर थोरात विजयी झालेअसून मंचचे प्रमुख राजेश पांडे यांनी निवडणुकीच्या प्रचाराची सूत्रे सांभाळली होती. वरळी येथील शासनाच्या पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात रविवारी मतमोजणी पार पडली. देशपातळीवरीव वैद्यकाच्या विविध परिषदांवर आपले नियंत्रण मिळविण्यासाठी भाजपकडून अत्यंत शिस्तबद्ध नियोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून ‘सीसीआयएम’च्या निवडणुकीकडे पाहावे लागेल. महाराष्ट्रात एकूण ५२ हजार मतदार असून २७,७३१ लोकांनी मतदान केले असून २८१५ मते बाद झाली. आयुर्वेद शिक्षणावर नियंत्रण ठेवणे, महाविद्यालयांचे निकष, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम निश्चित करणे, विद्यार्थी संख्या निश्चित करणे आदी कामे परिषद करत असल्यामुळे सीसीआयएमवर जाणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. महाराष्ट्रात २७ एप्रिल ते २७ मे या कालावधित पोस्टल पद्धतीने मतदान झाले.