|| जयेश शिरसाट
साधारण दहा वर्षांपूर्वी शहरातील अतिमहत्त्वाच्या शासकीय आस्थापना आणि मोठय़ा सराफा दुकानांमध्ये सीसीटीव्ही दिसू लागले. सुरुवातीला बाजारात उपलब्ध असलेल्या सीसीटीव्हींमध्ये मुद्रणाची (रेकॉर्डिग) व्यवस्था नव्हती. सीसीटीव्ही जे चित्रण कैद करीत ते संगणकावर सतत पाहावे लागे, त्यावर नजर ठेवावी लागे. हळूहळू तंत्रज्ञान विकसित झाले. सीसीटीव्हींचे चित्रण मुद्रणाची व्यवस्था निर्माण झाली. हे रेकॉर्डिग साठवून ठेवण्यासाठी आधी ‘व्हीसीआर’च्या कॅसेट मग डीव्हीडी आणि आता हार्डडिस्क अशी व्यवस्था उपलब्ध झाली. सध्या चेहरा पडताळणारे (फेस जॉग्रोफी) सॉफ्टवेअर सीसीटीव्हींना जोडले जात आहे. काळोखात घडणारी प्रत्येक हालचाल स्पष्टपणे टिपेल, अशी व्यवस्था असलेले ‘नाईट व्हिजन कॅमेरे बाजारात उपलब्ध आहेत. २६/११ हल्ल्यानंतर राज्य सरकारने शहरात सीसीटीव्हींचे जाळे उभारले. शहरातील प्रत्येक छोटय़ा-मोठय़ा सिग्नलवर आता कॅमेरे आहेत. रस्त्याकडील साध्या पानटपरीपासून बडय़ा मॉल, गृहनिर्माण संस्थांपर्यंत सर्वत्र सीसीटीव्हींचे जाळे पसरले आहे. थोडक्यात सीसीटीव्हींची आवश्यकता का आहे याची जाणीव झाल्यानेच इतकी मोठी यंत्रणा उभी राहत आहे.
रस्त्यावर घडलेली बारीकसारीक घटना पोलीस, महापालिकेच्या नियंत्रण कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिसू शकते. ती पाहून तात्काळ हालचाली करता येतात. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाला परस्पर दंडाची पावती (ई-चलान) धाडली जात आहे. हत्या, दरोडा, घरफोडय़ांपासून रस्त्यावर घडणाऱ्या प्रत्येक गुन्ह्य़ांची उकल करण्याचे आव्हान सीसीटीव्हींमुळे सुलभ होत आहे. उदाहरणार्थ चेंबूरच्या अमरमहल पुलावर दुचाकीस्वार तरुणांनी व्यापाऱ्याची गाडी अडवली. लूटमार करून पसार झाले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली, पण आरोपींचे चेहरे अस्पष्ट होते. दुचाकी नोंदणी क्रमांकही स्पष्ट दिसत नव्हता. फक्त दुचाकीचा रंग आणि मागील एक ‘स्टीकर’ तेवढा दिसत होता. त्याआधारे टिळकनगर पोलिसांनी शहरातील सर्व सीसीटीव्हींचे चित्रण पडताळले. तपास सुरू असताना कफ परेड भागात अशा वर्णनाची दुचाकी फिरताना पोलिसांना आढळली. सापळा रचून पोलिसांनी त्या आरोपींना अटक केली. अलीकडे सीसीटीव्ही असणार ही शक्यता गृहीत धरूनच चोर घरात, दुकानात, बँकेत शिरतात. शिरल्यानंतर कॅमेऱ्याची तोडफोड करतात आणि मुद्रणाची हार्डडिस्क वा डीव्हीआर सोबत नेतात. अनेक गुन्ह्य़ांमध्ये पोलिसांना हा अनुभव आला आहे. अशा परिस्थितीत पोलीस आसपासच्या सीसीटीव्हींची मदत घेतात. दहशतवादी हल्ला रोखण्यासाठी वा घडल्यास पुरावे गोळा करण्यासाठी सीसीटीव्हींनी पोलिसांना मोलाची मदत केली आहे. इथे सीसीटीव्ही आहे हे माहीत झालं की पोलिसांपासून खासगी सुरक्षा रक्षकही नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडताना दिसतात. म्हणजे सीसीटीव्हींचा धाक त्यांच्यावरही आहे. कसून तपासणी झाली की बखोटी पकडली जाणार याची पूर्ण कल्पना मंडळींना आहे. तोच धाक काही अंशी गुन्हेगारांवरही आहे.
पती-पत्नी दोघे कामावर निघून गेल्यानंतर लहान बाळाला सांभाळण्यासाठी नोकर ठेवतात. काही मंडळी घरगडय़ावर जबाबदारी सोपवून निघून जातात. तेव्हा घरी काय सुरू आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. नोकर बाळाला नीट सांभाळतोय का, घरगडी कामचुकारपणा वा चोरी तर करीत नाही ना, या शंका सतत उपस्थित होतात. त्यावर आयपी कॅमेऱ्यांचा पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे. या कॅमेऱ्यांनी टिपलेले चित्रण आपण जगात कुठेही असलो तरी मोबाइल, लॅपटॉपवर सहज पाहू शकतो. इमारतीत असला तरी घराबाहेरही सीसीटीव्ही असावा ही इच्छा वाढीला लागल्याने खासगीरीत्या कॅमेरे बसवून घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे.
सुरक्षा, प्रतिबंधात्मक उपाय, गुन्हेगारांवरला धाक याबाबतीत सीसीटीव्ही परिणामकारक ठरत आहेत या दुमत नाही. मात्र हीच यंत्रणा वाईट हेतू, उद्देश असल्यास धोकादायक ठरू शकते, हे स्पष्ट करणारी काही उदाहरणेही समोर येत आहेत. वैयक्तिकरीत्या म्हणजे घराबाहेर सीसीटीव्ही उभारताना वाद निर्माण होतो. पोलीस सांगतात घराबाहेर सीसीटीव्ही उभारताना त्याचा अँगल किंवा तोंड स्वत:च्या घरावर, मालमत्तेवर असावे. सीसीटीव्हीचे तोंड जर समोर असल्यास समोरच्या घरात राहणाऱ्यांना त्याचा जाच होऊ शकतो. ती वैयक्तिक आयुष्यातील ढवळाढवळ ठरू शकते. अशा परिस्थितीत तक्रार आल्यास सीसीटीव्हींची पाहणी करून आवश्यकतेनुसार त्यांची दिशा बदलण्याच्या सूचना केल्या जाऊ शकतात.
आयटी क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळीही हेच सांगतात. गेल्या काही वर्षांत सीसीटीव्ही तंत्रज्ञान इतके विकसित झाले की चित्रण टिपण्याचा परीघ कमी-जास्त करणे शक्य आहे. काय आवश्यक आहे काय, अनावश्यक आहे, हेही निश्चित करण्याची सुविधा आहे. रात्रीच्या अंधारातील हालचाली स्पष्ट पाहता येतात. त्यामुळे समोरच्या, शेजारी असलेल्या घरात सहज डोकावणे शक्य आहे. सीसीटीव्ही बसवून घेणाऱ्या प्रत्येकाचा हेतू वाईट आहे असे नाही, पण हेतूबाबत कोण हमी देणार? अनेक उच्चभ्रू इमारतींत सीसीटीव्हींचे जाळे असते. छोटासा नियंत्रण कक्ष असतो. त्यात सर्व सीसीटीव्हींचे चित्रण स्क्रीनवर पाहता येते. अनेक ठिकाणी खासगी सुरक्षारक्षकांना नियंत्रण कक्षात बसून हे चित्रण न्याहाळण्याची जबाबदारी सोपवली जाते. इमारतीच्या व्हरांडय़ातील सीसीटीव्हींचे चित्रण का म्हणून सुरक्षारक्षकांनी पाहावे? कोणत्या घरातल्या व्यक्ती कधी बाहेर पडल्या, कधी घरी परतल्या हे सुरक्षारक्षकांना का म्हणून समजावे. प्रवेशद्वारावरीलच सीसीटीव्हींचे चित्रण पाहण्याची सुरक्षारक्षकांना अनुमती असावी. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून दुसऱ्याच्या घरात, खासगी आयुष्यात डोकावल्यास तो गुन्हा ठरू शकतो. ही कृती हेरगिरीत मोडते, असे आयटीतज्ज्ञ शैलेश संसारे सांगतात.
सायबरतज्ज्ञ अॅड. विकी शहा यांच्या मते रहिवाशी वस्त्यांमध्ये दाटीवाटीने घरे असतात. इमारतींमध्येही प्रवेशद्वार एकमेकांना खेटून असते. अशा परिस्थितीत सीसीटीव्हींमुळे वाद निर्माण होऊ शकतात. सीसीटीव्ही ही काळाची गरज आहे. मात्र त्यांचा दुरुपयोग टाळण्यासाठी एक नियमावली तयार होणे आवश्यक आहे. सीसीटीव्ही बसवण्यासाठीचे नियम, अटी, शर्थी स्पष्ट असाव्यात. त्यानुसार आवश्यकता, सीसीटीव्हींची दिशा, इथे सीसीटीव्ही आहे आणि आपल्या हालचाली टिपल्या, साठवल्या जात आहेत ही माहिती प्रत्येकाला असावी, असे नियम केल्यास दुरुपयोग टाळता येईल. आयपी कॅमेऱ्यांची संख्या वाढते आहे. हे कॅमेरे पासवर्डच्या आधारे चित्रण दाखवतात. त्यामुळे हा पासवर्ड, यूजर आयडी गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. हे तपशील चुकून दुसऱ्याच्या हाती पडले तर ती व्यक्तीही आपल्या घरातले चित्रण पाहू शकेल. अनेकदा ज्याच्याकडून असे कॅमेरे विकत घेतले जातात तोच यूजर आयडी, पासवर्ड तयार करून देतो. तेव्हा ते घरी आणल्यावर किंवा त्याची जोडणी केल्यावर कॅमेरा फॅक्टरी रिसेट करून नवा यूजर आयडी, पासवर्ड देणे अत्यावश्यक आहे.
jayesh.shirsat@expressindia.com