मध्य रेल्वेवर बुधवारी सकाळी पुन्हा एकदा सिग्नलमधील तांत्रिक बिघाडामुळे गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. कल्याण स्थानकानजीक सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाडामुळे ही परिस्थिती ओढवल्याचे सांगितले जात आहे. या सिग्नलच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, काही वेळातच रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. मात्र, यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या रखडल्या असून, सकाळच्या वेळेत कार्यालये गाठण्यासाठी मुंबईकरांना चांगलेच हाल सोसावे लागण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवर गाडय़ा रुळांवरून घसरणे, ओव्हरहेड वायर तुटणे वा त्यात बिघाड होणे, या प्रकारांमुळे प्रवाशांचे मेगाहाल सुरू आहेत. आतापर्यंत देखभाल-दुरुस्तीच्या अभावामुळे हे बिघाड होत असल्याचे सांगणाऱ्या मध्य रेल्वेने गेल्या दोन आठवडय़ांमधील बिघाडांसाठी वादळी वाऱ्यांना कारणीभूत ठरवले आहे. मध्य रेल्वेवरील ओव्हरहेड वायरला धोकादायक ठरणारे हे वादळी वारे समुद्राच्या जवळ असलेल्या पश्चिम रेल्वेला मात्र अजिबातच त्रासदायक ठरलेले नाहीत! त्यामुळे आपल्या त्रुटी लपवण्यासाठी अधिकारी वादळी वाऱ्यांचा आडोसा घेत असल्याची टीका कामगार संघटनाच करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway collapse again in mumbai
First published on: 08-10-2014 at 09:40 IST