मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन नवीन सरकार स्थापन झाले त्यास दोन आठवडे पूर्ण होत असले तरी अद्यापही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कायार्लयात अधिकारी वा कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या नसल्याने सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री सचिवालय सुनेसुनेच दिसते. याउलट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची घडी बसून कारभारही सुरू झाला आहे.

एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्तास्थापन करीत मुख्यमंत्री म्हणून राज्याची सूत्रे ३० जूनला स्वीकारली. त्यानंतर बैठकांचा सपाटा आणि निर्णयांचा धडाका लावत तसेच दौरे करीत नव्या सरकाने आपल्या कामाची झलक दाखविण्यास सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोनच दिवसात मंत्रालयातून आपला कारभार सुरू केला. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या जुन्या बहुतांशी अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री कायार्लयात समाविष्ट करून घेतले आहे. उपमुख्यमंत्री कायार्लयात सचिव म्हणून डॉ. श्रीकर परदेशी यांनी पदभार स्वीकारला. तसेच आतापर्यंत १० अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. दैनंदिन बैठका, लोकांची निवेदने स्विकारणे ही कामे सुरू झाली. फडणवीस हे स्वत: मंत्रालयातील दालनात उपस्थित असतात. यातूनच उपमुख्यमंत्र्याच्या कार्यालयात नेत्यांचा, लोकांचा राबता वाढून कार्यालय गजबलेले असते.  सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री सचिवालय मात्र अजूनही सुनेसुनेच आहे.

कारण काय?

गेल्या आठवडय़ात शिंदे यांनी मुख्यमंत्री कार्यालयात विधिवत पदभारही स्वीकारला. मात्र त्यानंतरही शिंदे यांचा कारभार शासकीय निवासस्थानातूनच सुरू आहे. शिवाय मुख्यमंत्री सचिवालयात अद्याप सचिवांसह कोणाच्या नियुक्त्या न झाल्याने नेहमी गजबजणारे सचिवालय दोन आठवडय़ांपासून रिकामेच दिसते.

अतिथिगृहातून बैठका आणि दौरे..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे यांनी मंत्रालयात येऊन पहिली मंत्रिमंडळ बैठक घेतली. त्यानंतर बहुतेक बैठका या शासकीय निवासस्थानी किंवा सह्याद्री अतिथिगृहावर घेतल्या. त्यानंतर दिल्ली, आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूर, ठाणे दौराही केला.