शिवडी येथील हाजी बंदर परिसरात कोळशाच्या साठय़ामुळे मोठय़ा वायू प्रदूषण होत आहे आणि परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांचे आरोग्य खूप महत्त्वाचे असून वायू प्रदूषण करणारा कोळशाचा हा साठा धरमतर वा अन्यत्र हलवण्याबाबत विचार करा, अशी सूचना उच्च न्यायालयाने शुक्रवारी केली.

‘रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीरा सन्याल यांनी या मुद्दय़ाबाबत केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. त्या वेळेस याचिकाकर्त्यांनी कोळशामुळे शिवडी परिसरात कसे वायूप्रदूषण होत आहे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.हाजी बंदर येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या १९ एकर जागेवर आयात करण्यात आलेला १.५ लाख मेट्रीक टन कोळसा ठेवण्यात आलेला आहे. तो झाकून ठेवला जात नसल्याने वायूप्रदूषण होत आहे आणि त्याचा परिसरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.