मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ प्रकल्पाच्या कामासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ३२.५ किमी अंतराच्या रस्त्यावर रस्तारोधक (बॅरिकेट्स) उभे केले असून अनेक ठिकाणी रस्ते बंद करून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांपासून मुंबईकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मात्र, ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने रस्तारोधक हटवून मार्ग पूर्ववत करण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०२२ पर्यंत हा संपूर्ण रस्ता रोधकमुक्त करण्यात येणार आहे. ‘मेट्रो ३’ ही भुयारी मार्गिका असून भुयारीकरण, अवाढव्य अशा १७ ‘टेनल बोअरिंग मशीन’ (टीबीएम) जमिनीखाली पाठवण्यासाठी कुलाबा ते सीप्झदरम्यान रस्तारोधक उभे करून रस्ते बंद करण्यात आले आहेत. हे कसम २०१६ पासून सुरू आहे. त्यामुळे हे अडथळे मुंबईकरांना अडचणीचे ठरत असून वाहतूक कोंडीचा प्रश्नही गंभीर आहे. सणासुदीच्या काळात या मुद्यावरून ‘एमएमआरसी’ आणि नागरिकांमध्ये अनेक वेळा वाद झाला होता. आता मात्र हा त्रास दूर होणार आहे. ‘मेट्रो ३’चे काम वेगात सुरू असून सीप्झ ते बीकेसी असा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे ‘एमएमआरसी’चे नियोजन आहे. तसेच अनेक ठिकाणी मार्गिका आणि भुयारी मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने अडथळे हटवून रस्ते मोकळे करण्यात येतील, अशी माहिती ‘एमएमआरसी’च्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली. फेब्रुवारी २०२३ पर्यंत संपूर्ण मार्गातील रस्ता रोधक हटवून रस्ता मोकळा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. ऑक्टोबरपासून रस्तारोधक हटविण्यास सुरुवात होणार आहे.