मुंबई : पावसाळ्यात सखल भागात पाणी उपसणारी यंत्रणा अधिक प्रभावी असावी. हिंदमाता, गांधी मार्केट येथील उदंचन केंद्रांची क्षमता अधिक परिणामकारक पद्धतीने कार्यरत ठेवतानाच उदंचन केंद्राचे परिचलन अधिक सक्षम व्हावे, यासाठी काळजी घ्यावी. चुनाभट्टी रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचू नये आणि हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत न होण्याबाबत दक्षता घ्यावी, अशी सूचना महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिली. रस्ते काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण झाल्यावर रस्ता रोधक हटविण्यात आले का, उर्वरित बांधकाम साहित्य तसेच राडारोड्याची विल्हेवाट लावली आहे का, पदपथ सुस्थितीत आहेत का, याची पाहणी करुन खातरजमा करावी, असे आदेशही त्यांनी दिले.
पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभाग आणि रस्ते व वाहतूक विभागामार्फत मुंबईत विविध कामे सुरू आहेत. या अनुषंगाने, जोरदार पावसावेळी शहर विभागातील हिंदमाता, गांधी मार्केट आणि पूर्व उपनगरांतील चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळील पाणी साचण्याच्या संभाव्य ठिकाणांची तसेच रस्ते काँक्रीटीकरण कामांची भूषण गगराणी यांनी पाहणी केली. तसेच, अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक सूचना केल्या. हिंदमाता आणि गांधी मार्केट उदंचन केंद्राच्या ठिकाणी ”फ्लो मीटर” बसवावेत. सर्व पंपांची क्षमता एकसमान करावी.
आपत्कालीन समयी अतिरिक्त मनुष्यबळ नेमावे, उदंचन संच बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल जनित्र संच तातडीने उपलब्ध करून द्यावेत. पावसाच्या कालावधीत उदंचन केंद्र यंत्रणा पुरेशा क्षमतेने आणि वेळेत कार्यान्वित करावे. उदंचन केंद्र परिचालकांनी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधून पावसाचा नियमितपण अंदाज घ्यावा. अधिकाऱ्यांनी यंत्रणेला वेळोवेळी सतर्क करावे. चुनाभट्टी रेल्वे स्थानकाजवळील नाल्यांची व्यवस्थित स्वच्छता करावी. उदंचन संच बंद पडला तर पर्याय म्हणून दुसरा संच तातडीने तैनात ठेवावा, अशाही सूचना त्यांनी केल्या.
भूषण गगराणी यांनी शीव येथील जैन सोसायटी मार्ग, दादर येथील परळचा राजा मार्ग या सिमेंट काँक्रीट रस्ते कामांची देखील पाहणी केली. परळ येथील एफ दक्षिण विभाग कार्यालयातील आढावा बैठकीनंतर गगराणी यांनी नागरी सुविधा केंद्रास भेट दिली. तसेच, प्रशासकीय विभागांच्या सहायक आयुक्त यांनी नियमितपणे नागरी सुविधा केंद्रास भेट देऊन कामकाजाचा आढावा घ्यावा, असे आदेश गगराणी यांनी दिले.