भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त करणारा ठराव अखेर विधिमंडळाच्या उभय सभागृहांमध्ये सोमवारी मांडण्यात येणार आहे. या प्रस्तावावरून गोंधळ झाल्याने विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर टीका केली होती.
कॉ. पानसरे विधिमंडळाचे सदस्य नसल्याने शोक प्रस्ताव मांडता येईल का, याबाबत विचार करण्याचे आश्वासन सत्ताधारी भाजपच्या वतीने कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत देण्यात आले होते. विधिमंडळाचे सदस्य नसलेल्या ६० जणांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आल्याची यादीच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सादर केली होती. यावरून वाद निर्माण होऊ शकतो याचा अंदाज आल्यानेच सत्ताधाऱ्यांनी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, प्रकाश सावंत या विद्यमान सदस्यांबरोबरच कॉ. पानसरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करणारा ठराव मांडण्याचा निर्णय घेतला आहे.