मुंबई : दिवंगत लोकप्रतिनिधींचे कुटुंबीय निवडणूक रिंगणात असल्यास पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या राज्याच्या उच्च परंपरेनुसारच अंधेरीत माघार घेतल्याचा दावा भाजपने केला असला तरी गेल्या दीड वर्षांत पंढरपूर, कोल्हापूर उत्तर आणि देगलूर या तीन पोटनिवडणुका भाजपने सारी ताकद लावून लढविल्या होत्या. तेव्हा कुठे गेली होती उच्च परंपरा, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

१४व्या विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर २०१९ मध्ये झाल्यापासून आतापर्यंत चार विद्यमान आमदारांचे निधन झाले. यापैकी पंढरपूर, देगलूर आणि कोल्हापूर उत्तर या तीन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली. या तिन्ही मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजपने लढविली होती. यापैकी पंढरपूरमध्ये भाजपला विजयही मिळाला होता. देगलूर आणि कोल्हापूरमध्ये भाजपचा पराभव झाला.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध करावी म्हणून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या तत्कालीन मंत्र्यांनी भाजपला विनंती केली होती. पण तत्कालीन प्रदेशाध्यक्ष व मूळचे कोल्हापूरकर असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी ही विनंती फेटाळून लावली होती. विशेष म्हणजे काँगेसच्या उमेदवार या मूळच्या भाजपच्या होत्या. तरीही भाजपने सारी ताकद या मतदारसंघात पणाला लावली होती. भाजपचा पराभव झाला आणि काँग्रेसने जागा कायम राखली होती. नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. भाजप अंतर्गत मतभेद मिटविण्याकरिता देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये नेतेमंडळींच्या भेटी घेतल्या होत्या. भाजपकडे तगडा उमेदवार नव्हता. म्हणून शिवसेनेच्या माजी आमदाराला भाजपमध्ये प्रवेश देऊन त्याला उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जोर लावल्याने ही जागा कायम राखण्यात काँग्रेसला यश मिळाले होते.

काँग्रेसची टीका

अंधेरीत महाराष्ट्राच्या उच्च परंपरेची भाजपला आठवण झाली. मग पंढरपूर, कोल्हापूर उत्तर आणि देगलूर मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला या उच्च परंपरेचा विसर पडला होता का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.