देशपातळीवरील निकालांची पुनरावृत्ती राज्यातही घडली. भाजप-शिवसेना महायुतीने ४२ जागा जिंकून ऐतिहासिक पण अनपेक्षित असे यश मिळविले. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पार धुव्वा उडाला असून, काँग्रेसला अवघ्या दोनच जागांवर समाधान मानावे लागले.
महायुतीला मिळालेल्या यशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीच्या नेत्यांच्या आशा पलल्वीत झाल्या आहेत. राज्यातील ४८ पैकी भाजपला सर्वाधिक २३ जागा मिळाल्या. शिवसेना (१८), स्वाभिमान शेतकरी संघटना (१) अशा महायुतीचे एकूण ४२ उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीचे चार तर काँग्रेसचे दोन असे आघाडीचे सहा उमेदवार निवडून आले. छगन भुजबळ, सुनील तटकरे, शिवाजीराव मोघे आणि संजय देवतळे हे लोकसभेच्या रिंगणात उतरलेले चारही मंत्री पराभूत झाले. मनसेला भोपळाही फोडता आला नाही, तर आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना हजारांमध्येच मते मिळाली.
मुंबईतील सहाही मतदारसंघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार निवडून आले.    उत्तर मुंबईतून भाजपचे गोपाळ शेट्टी हे सुमारे साडेचार लाख मतांनी विजयी झाले. दोन लागोपाठ पराभवांनंतर किरीट सोमय्या यांना लॉटरी लागली. उत्तर-पश्चिम मतदारसंघातून भाजपच्या पूनम महाजन यांनी सुमारे दीड लाख मतांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा पराभव केला. केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांची विजयाची हॅटट्रिक होऊ  शकली नाही. शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. राहुल शेवाळे, गजानन कीर्तीकर आणि सावंत या शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांच्या विरोधात मनसेचे उमेदवार िरगणात होते. मनसेच्या मतविभाजनावर काँग्रेसच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून होते. पण तिघेही चांगल्या मताधिक्याने विजयी झाले.
विदर्भातील दहाही जागा महायुतीने जिंकल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये प्रथमच संघाचा स्वयंसेवक निवडून आला. भाजपचे नितीन गडकरी सुमारे अडीच लाखांनी विजयी झाले. केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा भाजपच्या नाना पटोले यांनी पराभव केला.
मराठवाडय़ातील आठपैकी सहा जागा महायुतीला मिळाल्या. बीडमध्ये गोपीनाथ मुंडे, औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरे, जालन्यात दानवे या महायुतीचे नेते विजयी झाले. उस्मानाबादमध्ये माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचा दारुण पराभव झाला. लातूरचा गड राखण्यात विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अमित यांना शक्य झाले नाही. नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विजय मिळवून ‘आदर्श’ हा मुद्दाच नांदेडमध्ये नाही हे दाखवून दिले. हिंगोलीत अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे राजीव सातव हे १८०० मतांनी विजयी झाले. मराठवाडय़ातील दोन मतदारसंघांतील विजयामुळे अशोक चव्हाण यांचे राजकीय वजन वाढणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील १२ पैकी नऊ जागा जिंकून महायुतीने राष्ट्रवादी-काँग्रेसला मोठा धक्का दिला. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य घटले. शरद पवार यांनी प्रतिनिधीत्व केलेली माढय़ाची जागा कायम राखण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. सांगलीची जागा भाजपने काँग्रेसकडून हिसकवून घेतली. उत्तर महाराष्ट्रातील सहाही जागा महायुतीने जिंकल्या. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचा दारुण पराभव झाला. काँग्रेसला पारंपारिक नंदुरबारची जागा गमवावी लागली. कोकणातील दोन्ही जागा युतीने जिंकल्या. ठाणे जिल्ह्य़ातील चारही जागा महायुतीने जिंकल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress defeat bjp win
First published on: 17-05-2014 at 05:53 IST