मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज्यात जिंकण्याची क्षमता असलेले तगडे उमेदवार उतरविण्याची काँग्रेसची रणनीती आहे. पहिल्या सात उमेदवारांच्या यादीत तीन विद्यमान आमदारांचा समावेश आहे. महाविकास आघाडीत तणावास कारण ठरलेल्या सांगली व भिवंडी मतदारसंघाचा वाद दिल्लीत मिटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसच्या वाटयाला १८ जागा येणार आहेत, हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र त्यांतीलच सांगली, भिवंडी, रामटेक तसेच मुंबईतील दोन मतदारसंघांवरून शिवेसना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद निर्माण झाला आहे. रामटेक व चंद्रपूर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेस अंतर्गतच मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या राज्यातल्या पहिल्या यादीत बळवंत वानखेडे (अमरावती), रवींद्र धंगेकर (पुणे) व प्रणिती शिंदे (सोलापूर) या विद्यमान आमदारांचा समावेश आहे. कोल्हापूरमधून छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देऊन, काँग्रेसने लढतीचे पारडे आधीपासूनच जड ठेवले आहे. नांदेड मतदारसंघात काँग्रेसने माजी आमदार वसंत चव्हाण यांना रिंगणात उतरविले आहे. हेही वाचा >>> सागर बंगल्यावर धाराशिवच्या उमेदवारीसाठी रांग, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर तोडगा काढण्याचे आव्हान काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत गोंदिया-भंडारा मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मैदानात उतरविले जाणार आहे, असे कळते. चंद्रपूर मतदारसंघासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु या मतदारसंघातून उमेदवारी मिळविण्यासाठी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर वडेट्टीवार हे आपल्या मुलीला उमेदवारी मिळावी, यासाठी आग्रही आहेत. परंतु भाजपकडून विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांना टक्कर देणारा उमेदवार हवा, त्यादृष्टीने विजय वडेट्टीवार यांना मैदानात उतरविण्याबाबत प्राधान्याने विचार केला जात असल्याचे कळते. उमेदवार निवडीची काँग्रेसची रणनीती काय आहे, असे विचारले असता, जिंकण्याची क्षमता असणारा उमेदवार हाच निकष आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. शिवसेना ( ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिरजमध्ये सांगली मतदारसंघातील त्यांचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेसची पंचाईत झाली आहे.