केवळ ४.०८ टक्के दावेदारांना विमा रक्कम वितरित

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जॉर्ज मॅथ्यू, एक्स्प्रेस वृत्तसेवा

मुंबई : देशातील करोनाबाधितांची संख्या सतत वाढत असून १ ऑगस्ट रोजी ही संख्या १७ लाख ५० हजारांवर पोहोचली. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर   विमा कंपन्यांकडे एकल आरोग्य विम्यासह करोना उपचारांसाठीच्या दाव्यांमध्ये गेल्या महिन्यापेक्षा २४० टक्के वाढ झाली आहे.

जुलैच्या अखेरच्या आठवडय़ात ७१ हजार ४२३ जणांनी करोना उपचारासाठी विमा कंपन्यांकडे ११४५.८७ कोटी रुपयांचे दावे केले आहेत, असे सामान्य विमा परिषदेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. २२ जूनला फक्त २० हजार ९६५ लोकांनी ३२३ कोटी रुपयांचे दावे केले होते. पंरतु, आतापर्यंत केवळ ४.०८ टक्के लोकांनाच विम्याची रक्कम मिळाली. सरासरी दाव्याची प्रतिव्यक्ती रक्कम १.६० लाख रुपये इतकी आहे.

करोना संसर्गाने आतापर्यंत ३७ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असला तरी केवळ ५६१ मृतांच्या नातलगांनी आयुर्विमा महामंडळाकडे २६.७४ कोटींचे दावे केले आहेत. मृत्यु पश्चात दाव्यांबाबत आयुर्विमा महामंडळ संवेदनशील असते. मृतांच्या कुटुबियांच्या आर्थिक मदतीसाठी मंडळ धावून जाते. करोनामुळे मृत्यूबाबतचे दावेही तत्परतेने निकाली काढले जात आहेत आणि संबंधितांना आर्थिक साहाय्य केले जात आहे, असे आयुर्विमा महामंडळाने स्पष्ट केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona insurance claims increase by 240 percent in a month zws
First published on: 03-08-2020 at 04:45 IST